जळगाव (प्रतिनिधी) आव्हाणी शिवारातील कचरा प्रकल्पातील कचरा पेटवित असल्याने होणाऱ्या धुरामुळे खोटेनगर, चंदुअण्णानगर, आव्हाणी, आव्हाने, निमखेडी, शिवधाम मंदिर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. या भागातील अनेक नागरिकांना श्वसनाचे आजार जडले आहेत. त्यामुळे विषारी वायू पासून संरक्षण करण्यासाठी महापालिकेने तात्काळ उपाय योजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीचे अॅड. कुणाल पवार यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.
शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावावी, असा शासनाचा नियम आहे. परंतू महापालिका चक्क कचरा पेटवून देत आहे. यातून निघणाऱ्या धुरामुळे लाखो लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून, प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शहरात दररोज तब्बल आठ ते दहा टन कचरा गोळा होतो. पूर्ण जळगाव शहराचा कचरा गोळा करून तो निमखेडी शिवारात आणला जातो. त्यात वेगवेगळ्या प्रकारचा कचरा असतो. प्रकल्प बंद असल्यामुळे त्याचे विघटन होत नाही. फक्त डोंगर उभा केला जातो. तसेच हिवाळा सुरू झाला की, दरवर्षी मोठ्या प्रमाणात कचरा जाळल्याने विषारी वायू निर्माण होतात. त्यामुळे परिसरात बहुतांश नागरिकांना श्वसनाचे त्रास होत आहेत.
मोठ्या प्रमाणत लोक स्वतःचे घर सोडून भाड्याच्या घरात राहत आहेत. त्यामुळे पालिकेतील सर्व अधिकारी पदाधिकारी या सर्वानी परिवारासह परिसरात रहायला या व त्यांना देखील या सुवर्ण संधीचा लाभ घेवू द्या, असा मिश्कील टोला अॅड. पवार यांनी निवेदनात लगावला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कचरा दररोज जाळला जात असल्याने त्याचा धूर परिसरात मोठ्या प्रमाणावर पसरतो. या धुरामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार उद्भवत आहेत. कचऱ्यामुळे दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना याठिकाणी राहणे कठीण झाले आहे. दरम्यान, प्रकल्प केंद्रांच्या परिसरात जमा झालेल्या या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची महापालिकेकडे कोणतीही सुविधाच नसल्याने महापालिकेचे कर्मचारी हा कचरा दररोज सकाळ, सायंकाळी येऊन पेटवून देतात. त्यामुळे प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण होत आहे.