भोपाल (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे आपल्यावर झालेल्या सामूहिक बलात्कारची पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही म्हणून दलित तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, २८ सप्टेंबर रोजी नरसिंहपूर येथील रिछाई गावात राहाणारी पीडिता शेतात गवत कापायला गेली होती. तेव्हा तिच्या शेजारी राहणाऱ्या तीन जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पीडितेने याबाबत पोलिसात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. चार दिवस पीडिता कुटुंबीयांसोबत पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल करण्याची विनंती करत होती. परंतू कुटुंबीयांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनलाच बसवण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी उलट तिला शिवीगाळ करून तिच्याकडे पैसे मागितले आणि त्या बदल्या कुटुंबीयांची सुटका करण्याबाबत सांगितले, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. अखेर ९ वाजता तिच्या सासु-सासऱ्यांची सुटका करण्यात आली. पण, चार दिवस उलटूनही तक्रार दाखल न केल्याने निराश झालेल्या पीडितेने शुक्रवारी गळफास लावून आत्महत्या केली.