नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यसभेत कृषी विधेयके मांडली जात असताना गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांना वर्षभरासाठी निलंबित केले पाहिजे, अशी मागणी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका पत्राद्वारे केली आहे.
रामदास आठवले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनही याबाबत एक ट्विट केले आहे. गोंधळ घालणाऱ्या खासदारांच्या पहिल्या चुकीबद्दल एक वर्ष आणि दुसऱ्या चुकीबद्दल संसदीय कार्यकाळापर्यंत निलंबित केले जावे आणि भविष्यात अशा घटना थांबवण्यासाठी संसदेत एक विधेयक आणले गेले पाहिजे असे देखील आठवले यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तर दुसरीकडे रामदास आठवले यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना म्हणाले की, खासदारांनी त्यांच्या बेकायदेशीर वागणुकीसाठी केवळ अधिवेशनापुरतेच नव्हे तर एका वर्षासाठी निलंबित केले पाहिजे. यानंतरही ते तसेच वागले तर त्यांना त्यांच्या उर्वरीत कार्यकाळासाठी निलंबित केले पाहिजे. अशा प्रकारचा कायदा संसदेत तयार व्हायला हवा. दरम्यान, राज्यसभेत कृषी विधेयके मांडली जात असताना गोंधळ घातला म्हणून निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या खासदारांमध्ये खासदार डेरेक ओ’ ब्रिएन, संजय सिंह, रिपुन बोरा, नजीर हुसैन, केके रागेश, ए करीम, राजीव सातव आणि डोला सेन यांचा समावेश आहे.