चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जामडी येथील शेतकऱ्याने स्वखर्चाने त्यांच्या शेतीपासून मुख्य रस्त्यापर्यंत दीड लांबणीचा रास्ता स्वखर्चाने तयार केला आहे. त्यामुळे त्यांना आता शेतमाल शेतातून आणताना नुकसान होण्याची भीती राहिलेली नाही.
सध्या पाऊस भरपूर पडत असल्याने नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. यामुळे नदीच्या गावाच्या शेतकऱ्यांना नदी-नाले ओलांडून आपला तयार झालेला शेतमाल बाजारात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकवेळा शेतमालाचे नुकसान देखील होत आहे. दिनांक 5 सप्टेंबर रोजी हिवरखेडा येथील शेतकरी शिवदास जाधव यांचा आद्रकने भरलेला ट्रॅक्टर अशाच पद्धतीने नदीच्या पाण्यात पलटी होऊन संपूर्ण कष्टाने कमावलेल्या आद्रक वाहून गेल्याने हा शेतकरी जागेवर बेशुद्ध झाला.
सदर व्हिडिओ अनेक ठिकाणी व्हायरल झाल्याने चाळीसगाव तालुक्यातील जामडी येथील शेतकरी दिपकसिंग राजपूत, भगवान परदेशी अरुण जाधव अनिल जाधव राजु परदेशी, सरदार परदेशी यांनी अशी वेळ आपल्यावर येऊ नये व आपल्याही शेतमालाचे नुकसान होऊ नये, म्हणून आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी नदी सोडून जवळपास दीड किलोमीटर अंतराचा शेत रस्ता स्वखर्चातून बनविला असून यामुळे आता या शेतकऱ्यांना आपला शेतातील माल केळी, टमाटर, अद्रक इतर जो काय असेल तो सुरक्षितपणे शेतातून बाहेर आणून बाजारात विकायला नेता येणार आहे. कुठल्याही शासकीय मदतीची किंवा निधीची वाट न पाहता तयार केलेल्या या रस्त्यामुळे सदर शेतकऱ्यांचे गावात व परिसरात कौतुक होत आहे. स्वतःच्या मालाच्या सुरक्षितेसाठी घेतलेली ही काळजी कौतुकास्पद असून यामुळे शेतकऱ्याला आपली मेहनत पाण्यात जाणार नाही. याचे समाधान होईल बऱ्याच वेळा शेतकऱ्याचे नुकसान झाल्यानंतर पंचनामे होतात. सोपस्कार पार पाडले जातात. मात्र मदत हवी तशी वेळेवर हातात पडत नाही म्हणून आम्ही स्वतः आमचा रस्ता तयार केला असे जामडी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रगतिशील शेतकरी दीपकसिंग राजपूत यांनी बोलून दाखविली आहे.