जळगाव (प्रतिनिधी) भाजपा हा पक्ष विचारांवर चालणारा पक्ष आहे. हा व्यक्ती केंद्रित पक्ष नाही. त्यामुळे पक्षातील कोणी एक जण गेल्याने त्याचा काहीएक परिणाम पक्षाच्या संघटनेवर होत नसतो. त्यामुळे एकनाथराव खडसे गेल्याने भाजपाला कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही,अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार गिरीश महाजन यांनी दिली आहे. ते जिल्हा भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकारांसोबत बोलत होते.
ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजप कोअर कमिटीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रांत संघटक विजय पुराणिक, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, चंदूलाल पटेल, माजी आमदार स्मिता वाघ, आदींची उपस्थिती होती. या बैठकीनंतर माजी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, महाराष्ट्रात फक्त जळगाव जिल्ह्यात पक्षाची कार्यकारिणी गठीत करण्याचे काम राहिले आहे. ही कार्यकारिणी गठीत करण्यापूर्वी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या म्हणणे, त्यांचे मत जाणून घेण्यासाठी हो बैठक घेतली. आजची कोअर कमिटीची बैठक ही नियमित स्वरूपाची होती. आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय आढावा घेऊन कार्यकारिणी जाहीर होणार असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.