मुंबई (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात दिलासा मिळाला आहे. ठाणे कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
ठाण्यातील पूल उद्घाटनाच्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेला हात धरून बाजूला केलं होतं. या प्रकरणी आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याविरोधात त्यांनी कोर्टात धाव घेतली. आव्हाड यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर आज ठाणे कोर्टामध्ये सुनावणी झाली. कोर्टाने आव्हाड यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. न्यायाधीश प्रणय गुप्ता यांनी आव्हाडांच्या अटक पूर्व जामीन अर्जावर निर्णय दिला.
जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने वकील गजानन चव्हाण यांनी बाजू मांडली. घटनास्थळी प्रचंड गर्दी होती असं सांगताना आव्हाड त्या महिलेला बहीण म्हणाले होते अशी माहिती त्यांनी कोर्टात दिली. तसंच महिलेने याआधी दोन पुरुषांना धक्काबुक्की केली होती असा दावा त्यांनी केला. राजकीय हेतूने हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.