चाळीसगाव (प्रतिनिधी) पहिले सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनामुळे तहकूब झालेली पालिकेची सर्वसाधारण सभा झाली. यावेळी एकूण ५८ विषय मंजूर करण्यात आले. दरम्यान, प्रभागांमध्ये कामे होत नसल्याची ओरड करत सत्ताधारींसह विरोधी सदस्यांनी देखील प्रशासनावर खापर फोडले असून याला प्रशासन जबाबदार असल्याचीही आगपाखड केली.
नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत शविआचे गटनेते राजीव देशमुख, संजय रतनसिंग पाटील, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. विद्यमान सदस्यांचा सत्ताकाळ ३० रोजी संपत असल्याने मंगळवारी झालेली सर्वसाधारण सभा शेवटची मानली जात आहे. सभेत ५६ क्रमांकाच्या विषयावरही चर्चा झाली. यात जळगाव-मनमाड रेल्वेसाठी तिसरी लाइन टाकण्याकरिता जागा संपादन करण्याविषयी योग्य त्या सूचना यावेळी पालिका सदस्यांनी सुचवल्या.
विरोधी व सत्ताधारी सदस्यांनी मंगळवारच्या सभेत एकीचा राग आळवत प्रभागांमध्ये कामे झाली नसल्याची ओरड केली. याला प्रशासन जबाबदार असल्याचीही आगपाखड केली. सदानंद हॉटेल ते सुवर्णाताई नगर हा रस्ता नवीन करण्याबाबत नगरसेवक अरुण अहिरे यांनी वेळोवेळी सूचना दिल्या. तथापि रस्त्याचे काम झालेच नाही. विशेष म्हणजे हा विषय सभेत मंजूरही झालेला आहे. याच रस्त्यावरून चार महिन्यापूर्वी दुचाकीवरुन जात असताना अरुण अहिरे यांचा अपघात होऊन त्यांना गंभीर दुखापत झाल्याची वस्तुस्थिती स्वतः अहिरे यांनीच सभेत मांडली. यावर सर्व सदस्यांनी रोष व्यक्त केला. शविआचे गटनेते राजीव देशमुख यांनी हा मुद्दा उचलून धरत याचे उत्तरच प्रशासनाकडून मागितले.
सदस्य सभागृहात ज्या समस्या व प्रश्न मांडतात, ते नागरिकांच्या सुविधांसाठी असतात. प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखले पाहिजे. शेवटी पाच वर्षानंतर नागरिक न झालेल्या कामांसाठी नगरसेवकाला जबाबदार धरतात. असा ऊहापोह नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी करून अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करावीत, अशी मागणी केली.