पाचोरा (प्रतिनिधी) रेल्वे लाईन क्रास करताना दोन वृद्धांचा धावत्या रेल्वेसमोर आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना परधाडे ते माहिजी रेल्वे स्थानका दरम्यान घडली. दुसखेडा येथून परधाडे येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात जाताना वृद्धांवर काळाने घाला घातला. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील दुसखेडा येथील अशोक झेंडू पाटील (वय ५५) व रत्नाबाई माधव पाटील (वय ६२) हे २४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दुसखेडा येथून पाडे येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पायी निघाले होते. दरम्यान, या दोन्ही गावांच्या मध्ये रेल्वे लाईन आहे. दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास रेल्वे लाईन क्रास करत असतानाच रेल्वे कि.मी. खंबा क्रं. ३८० / ३७ / ३९ नजीक अचानक भुसावळकडून मुंबईच्या दिशेने जाणारी कामायनी एक्सप्रेस भरधाव वेगाने येत होती.
अशोक पाटील व रत्नाबाई पाटील यांच्या लक्षात येईल, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. भरधाव कामायनी एक्सप्रेसने या दोघांना जबर धडक दिली. या धडकेत अशोक पाटील व रत्नाबाई पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तत्पूर्वी, रेल्वे येत असल्याचे लक्षात येताच अशोक पाटील यांनी त्यांच्या पत्नी बेबाबाई यांना तत्काळ बाजूला सारल्याने त्या बचावल्या आहेत. डोळ्यादेखतच पतीचा अपघात पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली. बेबाबाई यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनात पाचोरा पोलीस करत आहेत.