छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) पैठण रोडवरील कांचनवाडी जवळ धुळे-सोलापूर महामार्गाच्या उड्डाणपुलाजवळ शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास विचित्र व अत्यंत गंभीर अपघात झाला. ब्रेक फेल झालेला एक ट्रक थेट ट्राफिकमध्ये घुसला आणि त्याने तब्बल १२ वाहनांना धडक दिली. या अपघातात एक महिला ठार झाली असून अन्य १४ ते १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मनिषा पद्माकर सिंगणापुरे (४०, रा. चितेगाव, ता. पैठण) असे मयत महिलेचे नाव आहे.
सोलापूरकडून धुळ्याकडे जाणारा ट्रक (एमएच २६, बीई १६४०) कांचनवाडी उड्डाणपुलाच्या बाजुने पैठण रोडवर उतरला. उतरताना या ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले. त्याचवेळी रस्त्याचे काम सुरु असल्याने पैठण रोडवर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. या वाहनांना चिरडत अक्षरशः चिरडत ट्रक पुढे निघाला. कंपनी सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या कर्मचारी, कामगारांना याचा मोठा फटका बसला. ट्रकने सर्वात आधी इलेक्ट्रिक बाईकला (एमएच २० जीडी ९४८७) उडविले. यात या बाईकचा पूर्णपणे चुराडा झाला. त्यानंतर ट्रक बोलेरो पिकअपवर (एमएच २०, ईजी १५६२) जाऊन आदळला. त्यामुळे पिकअप एका बाजुने उलटला, ताबा सुटलेला हा बेफाम ट्रक एवढ्यावरच थांवला नाही. समोरील दुसऱ्या दुचाकीला (एमएच २०, ईव्ही १६३३) उडविले. त्यावर तिसरी दुचाकी (एमएच २०, एफएस ०८५६), चौथी दुचाकी (एमएच २० बीएच ३९०१), पाचवी दुचाकी (एमएच २०, बीजी ०३४४), सहावी दुचाकी (एमएच २०, डीयू ५८८३), सातवी दुचाकी (एमएच २०, सीएक्स ४१५४) आणि आणखी एका पिकअपला (एमएच २० ईजी ७९८२) उडविले. या अपघातात दोन कारलाही (एमएच २०, बीवाय ६८६१ आणि एमएच २०, सीएच ५५७१) ट्रकची धडक बसली. अपघातग्रस्त सर्वच वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.