जळगाव (प्रतिनिधी) शहरातील ‘सागर पार्क’वरून महाविकास आघाडी सरकारवर बिनबुडाचे आरोप करून ‘बीएचआर’ घोटाळ्यावरून लक्ष विचलित करण्यापेक्षा आ. राजूमामामा भोळे यांनी किमान महापालिका व्यवस्थित सांभाळावी, असा मिश्कील टोला राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांनी लगावला आहे.
वॉटरग्रेस प्रकरणी आमदार गिरीश महाजन यांचे प्रसार माध्यमांमध्ये नाव घेतले जात असल्याबद्दल आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत आमदार राजूमामा भोळे यांनी शहरातील सागरपार्कची जागा हडप करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारतर्फे १०० कोटी रूपयांची सुपारी देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप केला होता. यावर राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना म्हणाले की, ‘सागर पार्क’चा विषय काढणे म्हणजे ‘बीएचआर’ घोटाळ्यावरून लक्ष विचलित करण्याचा केवीलवाणा प्रयत्न आहे. सागर पार्कचा जेव्हा विषय समोर येईल, तेव्हा सत्य जनतेसमोर येईल. तूर्त राजूमामा भोळे यांनी महापालिकेकडे लक्ष द्यावे. महापालिका व्यवस्थित चालवावी. नागरिक अनेक समस्यांना सामोरे जाताय, त्याकडे लक्ष द्यावे…उगाच म्हणजे ‘बीएचआर’ घोटाळ्यावरून लक्ष विचलित करण्याचा केवीलवाणा प्रयत्न करू नये, असा टोला अभिषेक पाटील यांनी आ. राजूमामा भोळे यांना लगावला आहे.