मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील कांदिवली येथील हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलात बनावट लसीकरण केल्या प्रकरणातील आरोपी डॉ. मनीष त्रिपाठी अखेर आज कांदिवली पोलिसांसमोर शरण आला आहे.
शहरात विविध ठिकाणी बोगस लसीकरण शिबिर आयोजित करून फसवणूक करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. या प्रकरणी मुंबईच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये सात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर याप्रकरणी आता मुंबई पोलिसांकडून एसआयटी सुद्धा नेमण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे पूर्ण विश्व त्रस्त आहे अजूनही यावर उपचार सापडला नाही. मात्र लसीकरण केल्यामुळे या जीवघेण्या आजाराला लांब ठेवण्यास मोठी मदत होत आहे. मात्र आता काही लसीकरण याच्या नावावर सुद्धा पैसे कमवून लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. अशाच एका टोळीला जी मुंबईमध्ये लसीकरणाच्या नावावर लोकांची फसवणूक करत होती त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी मुंबईमध्ये सात गुन्हे दाखल असून एकूण दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशातच आता या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या डॉ. मनिष त्रिपाठी यांनी आत्मसमर्पण केलं आहे.
बोगस लसीकरण शिबिर आयोजित करणाऱ्या टोळीला अटक
कांदिवली इथल्या हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलातल्या नागिरकांनी बोगस लसीकरणाबद्दलची तक्रार केली होती. इथे आयोजित लसीकरण शिबिरात प्रतिडोस १२६० रुपये आकारले जात होते. या प्रकरणात आता मुंबई शहरात विविध ठिकाणी बोगस लसीकरण शिबिर आयोजित करणाऱ्या या टोळीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी ८ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून १२ लाख ४० हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. ही रक्कम या टोळीने फसवणूक करुन मिळवली होती.