जळगाव (प्रतिनिधी) – आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन भवन, जळगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीत बियाणे, खतांचा पुरवठा, पाणी उपलब्धता, पीक नियोजन तसेच शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी प्राधान्याने सोडवून खरीप हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने समन्वयाने व तत्परतेने कार्य करावे, असेही यावेळी नमूद केले.
या बैठकीस जिल्हाधिकारी रोहन घुगे, आमदार सुरेश दामू भोळे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
















