
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील मेहरून सर्वे क्र. ४१०/१ तसेच ४०६, ४०७ मधून जाणारा गुरु पेट्रोल पंप ते पाचोरा रोड हा मुख्य डीपी रोड अत्यंत वर्दळीचा असून, रस्त्याची झालेली दयनीय अवस्था नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली होती. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे विद्यार्थी, पालक, मजूर, नोकरदार, शाळेच्या बसचे चालक तसेच इतर वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अपघाताचा धोका वाढल्याने नागरिकांकडून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत होती.
या गंभीर समस्येची दखल घेत नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. त्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत आयुक्तांनी संबंधित अधिकारी वर्गाला तात्काळ घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
आयुक्तांच्या आदेशानुसार नगररचनाकार अमोल पाटील व शाखा अभियंता आर. टी. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्थायी समिती सदस्य नितीन सपके, नगरसेविका सुरेखा तायडे, नगरसेवक प्रफुल्ल देवकर तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
पाहणीनंतर रस्त्याच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक (इस्टिमेट) तातडीने तयार करून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करत काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी आयुक्त तसेच पाहणीसाठी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याचे काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.
प्रभाग क्रमांक १३ मधील या महत्त्वाच्या प्रश्नासाठी नगरसेविका वैशाली अमित पाटील, स्थायी समिती सदस्य नितीन सपके, नगरसेविका सुरेखा तायडे आणि नगरसेवक प्रफुल्ल देवकर या चारही लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांची दखल घेत प्रशासनाने त्वरित कारवाई सुरू केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे, आयुक्तांनी विद्यार्थी, पालक, मजूर, नोकरदार, शाळेच्या बसचे चालक व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी संवेदनशीलपणे समजून घेत तातडीने अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणीचे आदेश दिल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करून विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपले प्रयत्न यापुढेही सुरू राहतील, असा विश्वास नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी व्यक्त केला.















