
जळगाव (प्रतिनिधी) – किरकोळ वादातून हाणामारी करीत रस्त्यावर पडलेला दगड डोक्यात घालून जीवन शालीक पाथरकर (वय ३८, रा. रोटवद, ता. जामनेर, ह.मु. हरिविठ्ठल नगर) यांची हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास शामनगर परिसरात उघडकीस आली. सुरुवातीला मयताला अनोळखी म्हणून रुग्णालयात दाखल केले. मात्र नातेवाईकांनी ओळख पटविल्यानंतर घातपाचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
शहरातील शामनगर परिसरातील रेल्वे पुलाजवळ अनोळखी इसमाचा मृतदेह मिळून आल्याने नागरिकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती रामानंद नगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी सुशील चौधरी,. जितेंद्र राजपुत, अजित पाटील, जितेंद्र राजपूत, सुधाकर अंभोरे हे रुग्णालयत दाखल झाले. त्यांनी नातेवाईकांचा शोध घेत मयत जीवन पाथरकर यांची ओळख पटविली. यावेळी नातेवाईकांनी मयताच्या अंगावर असलेल्या जखमांवरुन त्याच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी लागलीच तपासचक्रे फिरविण्यास सुरुवात केली.
पंधरा वर्षांपुर्वी आले होते जळगावात
मयत जीवन शालीक पाथकर हे मुळचे जामनेर तालुक्यातील रोटवद येथील रहिवासी असून सुमारे पंधरा वर्षांपुर्वी कामा निमीत्त वयोवृद्ध आई सोबत जळगावात राहण्यासाठी आले होते. पत्नीने सोडून दिल्यानंतर त्यांच्या मुलाने देखील लग्न करुन घेतले. त्यामुळे जीवन पाथरकर हे एकटेच असल्याने मिळेल ते काम करुन त्यावर स्वतःचा उदर्निवाह करीत होते.
मयताच्या डोक्यावर गंभीर दुखापत
जीवन पाथरकर आणि दोघ संशयित हे एका ठिकाणी बसले होते. पाथरकर याने एका वृद्ध व्यक्तीला त्याने आणलेली खिचडी खाण्यासाठी दिली. तसेच ती खिचडी तिसऱ्या व्यक्तीला देवू नको असे सांगितल्याने त्यांच्यात वाद झाला. या वादातून त्या संशयिताने जीवन पाथरकर यांना मारहाण केली. या मारहाणीत खाली पडलेला दगड उचलून संशयिताने जीवन पाथकर यांच्या डोक्यात घातला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.
















