नागपूर (वृत्तसंस्था) उमरेड येथून १५ किमी अंतरावरील बेसूर गावातील कामगार युवक एमआयडीसीतील प्लास्टिक कंपनीतून ड्युटी आटोपून दुचाकीने घरी परतत असताना अज्ञात ट्रकने दुचाकींना चिरडले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू तर चौघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (३१ ऑगस्ट) रात्रीच्या सुमाराची किल्लेपार फाट्याजवळील आहे.
या भीषण अपघातात लकी चिंतामण अडसकर (२८) व रितेश गणेश श्रीवास (१८) यांचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश दिलीप तांदूळकर (२४), सौरभ अमृत चौधरी (२५), मयूर अमृत चौधरी (२१), गोपीचंद रामदास देवगडे (२९, रा. सर्व बेसूर, ता. भिवापूर, जि. नागपूर) येथील रहिवासी आहेत. नेहमीप्रमाणे मृतक व जखमी युवक एमआयडीसीत सकाळी ड्युटीवर गेले होते. ते ड्युटीवरून दोन दुचाकींनी गावाकडे परतत असताना किल्लेपार फाट्याजवळ अज्ञात ट्रकने दुचाकी (क्रमांक एमएच ४० / बीटी ५२५७) ला धडक दिली.
या धडकेत दुचाकीसमोरील दुचाकी क्रमांक (एमएच ४०/८९५६) वर जाऊन आदळली. सहाही युवक खाली पडले.यानंतर त्यांना ट्रकने दूरवर चिरडत नेले. यामध्ये जखमींना तातडीने नागपूर मेडिकल कॉलेजला उपचारार्थ हलविण्यात आले. फिर्यादी गोपीचंद देवगडे, रा. बेसूर यांच्या तक्रारीवरून उमरेड पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस राजेंद्र वाघ हे करीत आहेत.