धरणगाव (प्रतिनिधी) चोपडा-अमळनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दिशादर्शक फलक चुकीच्या ठिकाणी लावल्याने प्रवाशांना मनस्ताप होत होता. त्यामुळे हा फलक तत्काळ योग्य ठिकाणी लावावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कॉंग्रेसचे युवानेत चंदन पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला होता. चंदन पाटील यांच्या दणक्यानंतर ‘तो’ दिशादर्शक फलक अखेर आज हटविण्यात आला आहे.
धरणगाव तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे अमळनेर-चोपडा रस्त्यावरील दिशादर्शक फलक चुकीच्या ठिकाणी लावण्यात आला होता. यामुळे अमळनेरकडे जाणारे प्रवाशी अनेकदा धरणगाव कोर्टाच्या दिशेने वाहन वळवित होते. त्यामुळे पुढे गेल्यावर वाहन चालकांच्या लक्षात यायचे की, आपण रस्ता भरकटलो आहोत. अनेकवेळा रात्रीच्या वेळेस कार, दुचाकीवर जाणारे दाम्पत्य रस्ता चुकल्याने भयभीत झाल्याचे प्रकार घडले होते. भविष्यात यातून काही विपरीत घटना देखील घडू शकते, अशी भीती व्यक्त करत चंदन पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला हे दिशादर्शक फलक पाटाच्या अलीकडे न लावता पलीकडे लावण्याची सूचना केली होती. त्यानुसार आज हा दिशादर्शक फलक हटविण्यात आला असून त्याला लवकरच चंदन पाटील यांनी सुचवलेल्या जागेवर लावण्यात येणार असल्याचे कळते. यावेळी विकास लांबोळे, योगेश येवले, राहुल महाले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.