कोल्हापूर (वृत्तसंस्था) महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मजबूत आहेत. त्यामुळे सरकार पडण्याचा प्रश्नच नाही. उलट अशीच परिस्थिती राहिली तर महाविकास आघाडी पुढचे २५ वर्षे सत्तेत असेल, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला. “विजय हा विनयाने स्वीकारायचा असतो. भाजपने सत्तेचा उपयोग सूड उगवण्यासाठी केला. त्यामुळे सुशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारलं आहे. भाजपने आता विचार करण्याची गरज आहे,” असा सल्लाही मुश्रीफ यांनी दिला.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये जोरदार मुसंडी मारल्यानंतर आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “दोघेही म्हणत असतील की काश आज ईव्हीएम मशीन होता,” असं मुश्रीफ म्हणाले. तसंच मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर सत्य समोर येते असे म्हणत अप्रत्यक्षरीत्या ईव्हीएमवर आक्षेप नोंदवला. लोकांचा ईव्हीएम मशीनवर विश्वास राहिला नसल्याचे देखील हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. अनेक प्रगत देशात आज देखील बॅलेट पेपरवर निवडणुका होतात. मात्र आपल्या देशात ईव्हीएमवर निवडणुका घेतल्या जातात, असं त्यांनी सांगितलं. “मुख्यमंत्री किंवा कुणावरही टीका केल्यानंतर मुश्रीफ का माझ्यावर टीका करतात?” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला. “मी त्यांना सांगतो विरोधी पक्षात असताना दादांनी मला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर संताप व्यक्त करत असतो,” असंही हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.