जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी संगनमताने अमळनेर तालुक्यातील सात्री गावातील एकाच कुटुंबीयांच्या संस्थांना सहा रेशन दुकानांची खैरात वाटल्याचा आरोप छत्रपती शिवाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आला आहे. तसेच या दुकानांचे परवाने रद्द करुन त्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
काय आहे नेमका प्रकार
अमळनेर तालुक्यातील सात्री गावातील महेंद्र बोरसे यांना जिल्हा पुरवठा विभागाने सहा रेशन धान्य दुकानांचे परवाने दिले आहेत. बोरसे यांना 2006 या वर्षी छत्रपती शिवाजी बहूउद्देशीय मंडळाच्या नावाने सात्री येथील धान्य दुकान मिळालेले आहे. त्यानंतरही पुरवठा विभागाने त्याला जोड सहा धान्य दुकाने दिली. धक्कादायक म्हणजे त्या संस्थांचे सदस्य व पदाधिकारी एकाच परिवाराचे आढळून आले आहेत. त्यांनी खोटे प्रतिज्ञापत्र देवून परवाने घेताना शासनाच्या नियमांची पायमल्ली केली. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे जिल्ह्यात किती रेशन दुकानांची खैरात वाटली?,याबाबत चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे.
एकाच कुटुंबाकडे चार रेशन दुकानांचा परवाना दिल्याची कबुली
संस्थांचे परवानाधारक अनुदानित माध्यमिक शाळेच्या पूर्णवेळ शिक्षिका असताना दुकान परवाना खोटे प्रतिज्ञापत्र करुन मिळवले असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. संस्थांचे प्रतिज्ञापत्रच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, त्या व्यक्तीकडे पूर्वीची दोन रेशन दुकाने होती. नवीन जाहीरनाम्यानुसार खेडी बुद्रुक व मुडी प्र.अ.येथील रेशन दुकानांसाठी एकमेव अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे एकाच कुटुंबाकडे चार रेशन दुकानांचा परवाना देण्यात आल्याची कबुली जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली आहे.
ही आहेत दुकाने
आई पेडकाई महिला बचत गट सात्री (खेडी बुद्रुक),निर्मलाई फाऊंडेशन सात्री (मुडी प्र.अ.),सावित्रीबाई फुले महिला बचत गट सात्री (करणखेडा),चामुंडाई माता महिला बचत गट सात्री (अमळनेर 7) व रिध्दी-सिध्दी स्वयंसहाय्यता महिला बचत गट अमळनेर (अमळनेर)