धरणगाव (प्रतिनिधी) राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागू झाली आहेत. त्यानुसार धरणगाव शहरातील नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी लावलेले राजकीय फलक, झेंडे, फोटो, भित्तिपत्रके काढण्यास सुरुवात केली आहे.
निवडणूक जाहीर झाल्यापासून पुढील ४२ दिवस ही आचारसंहिता राहणार आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर होताच पालिका प्रशासनाने आचारसंहिता अंमलबजावणीला सुरूवात केली आहे. शहरात पालिकेने कारवाई सुरू करत अनेक झेंडे व काही बॅनर काढून जप्त केले. तर राजकीय पक्षांचे व लोकप्रतिनिधींचे फलक कापडाने झाकण्याचे काम सुरू केले आहे.
यावेळी असे भरावे लागेल नामनिर्देशन पत्र
यावेळी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र ऑनलाइन http:/panchaytelection.maharashtra.gov.in या वेबसाईटवर भरावे लागणार आहे. त्यासाठी आयोगाने महाऑनलाइनच्या मदतीने उमेदवारांना नामनिर्देशन पत्र आणि शपथपत्र सहज भरता यावे यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यामुळे उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करताना स्वाक्षरी करुन अर्ज वेळेत भरून द्यावा लागणार आहे. दुसरीकडे यावेळी जात वैधता प्रमाणपत्र जमा करण्यासाठी १२ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. मात्र अचानक नगर परिषद निवडणुकीची घोषणा झाल्याने इच्छुकांचे धाबे दणाणले आहे.