जळगाव (प्रतिनिधी) – वीज ग्राहाकांच्या मनात नवीन मीटर बाबात अनेक शंका कुशंका आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून नवीन मीटर बसविण्यास विरोध होत आहे.ग्राहक नवीन वीज मीटर बसवत नसल्यामुळे वीज वितरण कंपनीकडून जुने मीटर धारकांचे रिडींग न घेता रिडींग उपलब्ध नाही, असे दाखवून अव्वाचे स्वव्वा बिले दिली जात आहेत. त्यामुळे भर उन्हाळ्यात ग्राहकांना आणखी घाम फोडण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून केले जात आहे.
वीज वितरण कंपनीकडून जूने मीटर असलेल्या ग्राहकांना सरासरी बिले देण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा पडत आहे. सर्व सामान्य ग्राहकांचे ७०० ते ८०० रुपये बील येत असतांना अचानक त्यांना २ ते ३ हजारांची बिले आल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. ग्राहक बील कमी करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात गेल्यावर त्यांना तेथील कर्मचाऱ्यांकडून फिरवा फिरव केली जाते. तसेच आलेले बिल भरून टाका, पुढील बिलात कमी होवून जाईल, असे सांगून बिल कमी करण्यास टाळाटाळ केली जाते. तरीही ग्राहक बिल कमी करून द्या म्हणत असेल तर, त्यांना शहरातील मुख्य कार्यालयाकडे पाठविले जाते. तेथे देखील कर्मचाऱ्यांकडून साहेब नाहीत, उद्या या… परवा या… असे कारणे सांगून फिरवा फिरव केली जाते. यामुळे वीज ग्राहकांना भर उन्हात चकरा माराव्या लागत आहेत.
ग्राहकांना दिला जातोय आर्थिक भुर्दंड
वीज वितरण कंपनीकडून १०० युनिटच्या आत ३.९६ रुपये प्रतियुनिट दर आकारले जातात. तर, १०१-३०० युनिटपर्यंत १०.८० रुपये प्रतियुनिटचे दर लावले जातात मात्र, जुने मीटर धारकांचे १०० युनिटच्या आत रिडींग असतांना महावितरणकडून सरासरी बिले आकारतांना १०० युनिट पेक्षा जास्त युनिट दाखवून ग्राहकांना आर्थिक चूना लावण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून करण्यात येत आहे.
रिडींगची जबाबदारी कोणाची
ग्राहकांच्या वीज मीटरचे रिडींग न घेता बिले दिली जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठ्याप्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. परंतु वीज मीटरचे रिडींग घेण्याची जबाबदारी वीज वितरण कंपनीची असतांना वीज वितरण कंपनीने नियुक्त कर्मचाऱ्यांनी रिडिंग न घेतल्यास त्याला जबाबदार वीज वितरण कंपनी असतांना सरासरी बिल देवून ग्राहकांवर आर्थिक बोझा टाकण्यात येत आहे.
















