जळगाव (प्रतिनिधी) शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरण दिनानिमित्त समतादूत प्रकल्पांतर्गत ५ ते २० जून, २०२१ या कालावधीत वृक्षारोपण पंधरवाडा अभियान राबविण्यात येत आहे. या काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा प्रकल्प अधिकारी, समतादूत, प्रकल्प बार्टी, श्रीमती भाग्यश्री पाईकराव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
त्याअनुषंगाने येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते तर जिल्हा परिषदेच्या आवारात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) कमलाकर रणदिवे, जिल्हा प्रकल्प अधिकारी (समतादूत प्रकल्प बार्टी) श्रीमती भागयश्री पाईकराव, तालुका समतादूत सरला गाढे, सविता चिमकर, कल्पना बेलसरे आदि उपस्थित होते.