
जळगाव (प्रतिनिधी) – पुर्वीपासून करीत असलेली शेती यंदा करण्यास दिली नाही या कारणावरुन गोविंदा धुडकू पाटील (वय ५४, रा. वाकडी, ता. जळगाव) यांना शेतात पाणी भरत असतांना कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. १० जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता वाकडी ता. जळगाव येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील वाकडी येथे राहणारे गोविंदा पाटील यांनी दोन वर्षांपुर्वी त्यांची शेती मोठ्या भावाला करण्यासाठी दिली होती. परंतू यंदा ते स्वतः शेती करीत असल्याने दि. १० जून रोजी सकाळी शेतात पाणी भरण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांची वहिनी, पुतण्या आणि सून हे त्याठिकाणी आले. त्यांनी शिवीगाळ करीत तू शेती कशी करतो असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर कुऱ्हाडीचा लाकडी दांडा डोक्यात मारुन दुखापत केली. गंभीर जखमी झालेल्या गोविंदा पाटील यांनी उपचार घेतल्यानंतर तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















