जळगाव ( प्रतिनिधी ) – एटीएम कॅबीन आता ठगेगिरी करण्याचे केंद्र झाल्याचा परिचय घटनांमधून येऊ लागला आहे. यात सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक, शेतकरी निवृत्त कर्मचारी यांची फसवणूक केली जात आहे. एटीएम कार्डाची खुबीने अदलाबदल करत ठग खात्यातून पैसे काढुन घेताहेत. एका मनपा कर्मचाऱ्याचे कार्ड हातचलाखीने बदलून घेत ५० हजार रुपये खात्यातून काढुन घेतल्याचा आणखी एक फसवणूकीचा प्रकार शहरात उघडकीस आला आहे.
महानगर पालिकेत कार्यरत असलेल्या ५८ वर्षीय कर्मचारी हे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील भिलपुरा चौक येथील एसबीआयच्या एटीएममध्ये खात्यातील पैसे काढण्यासाठी आले होते. एका ठगाने त्यांच्या साधेपणाचा फायदा घेत हातचालाकी करत एटीएम कार्ड आपसात बदलुन घेतले. त्यानंतर या गृहस्थाच्या बँक खात्यातून त्याने ५० हजार रुपये काढुन घेतले. रक्कम विड्रॉल झाल्याचा संदेश आल्याने फसवणूक झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. तक्रारीनुसार याप्रकरणी गुरुवारी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी बँकेच्या एटीएमवर जावुन प्रकार जाणुन घेतला. हवालदार युवराज कोळी तपास करीत आहेत.
















