जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेत पैसे परत मागण्यास येणाऱ्या ठेवीदारांना आरोपी धमक्या द्यायचे. पतसंस्थेच्या परिसरात अत्यंत भीतीचे वातावरण होते, यासह अनेक गंभीर मुद्दे मांडत सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी आरोपींच्या जामिनाला जोरदार विरोध केला आहे. दरम्यान, सरकारी पक्षाचा युक्तिवाद आज अपूर्ण राहीला असून तो उद्या युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता आहे.
अॅड.प्रवीण चव्हाण यांनी संशयित आरोपींच्या जामीन अर्जाला आजपासून युक्तिवादद्वारे विरोध करायला सुरुवात केली आहे. अॅड. चव्हाण यांनी आज न्यायालयासमोर अनेक गोष्टी पुराव्यानिशी मांडल्या. त्यात प्रामुख्याने बीएचआर पतसंस्था ही मल्टीस्टेट असल्यामुळे तिला एमपीडीए कायदा लागू होतो. आरोपींविरुद्ध याच कायद्यान्वये गुन्हा दाखल आहेत. हे कलम अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे आरोपींना जामीन देण्यात येऊ नये. तसेच पावत्या मॅचिंग करताना पावत्या कायद्याप्रमाणे मॅचिंग केल्या असे, गृहीत धरले तरी ही रक्कम कंडारीने शासन जमा केली नाही. तसेच सत्तर टक्के पैसे मिळाल्याचे कोणत्याही प्रतिज्ञापत्रात नमूद नाही. पुरावे म्हणून अॅड. चव्हाण यांनी अनेक पुरावे न्यायालयासमोर ठेवले.
दरम्यान, सोमवारी ५ संशयितांच्या वकिलांनी जामीनासाठी आपली बाजू न्यायालयासमोर मांडली होती. तर याआधी २ जुलै रोजी जयश्री तोतला, जयश्री मणियार आणि भागवत भंगाळे या तिघांच्या वकिलांनी आपले म्हणणे कोर्टासमोर सादर केलेले आहे. बीएचआर मधील साधारण १२०० कोटीच्या घोटाळा प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २०२० आणि २०२१ अशा दोन वेळी राज्यात छापेमारी करून बीएचआर घोटाळ्यातील संशयितांना अटक केली आहे.
यातील १७ जून रोजी अटक केलेल्या ११ पैकी अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोकटा, भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), प्रितेश चंपालाल जैन (धुळे), राजेश लोढा (जामनेर) या संशयितांनी जामिन अर्ज दाखल केले होते. तर यापैकी जयश्री तोतला आणि जयश्री मणियार या दोघांचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने २५ जून आधीच फेटाळून लावलेला आहे.
त्यानंतर २ जुलै रोजी जयश्री तोतला, जयश्री मणियार आणि भागवत भंगाळे या तिघांच्या जामीन अर्जावर सुनवाईच्या वेळी आपली बाजू मांडली आहे. तर ५ जुलैला छगन झाल्टे, जितेंद्र रमेश पाटील, प्रितेश चंपालाल जैन, प्रेम नारायण कोकटा, राजेश लोढा या उर्वरित संशयितांच्या वतीने अॅड.सुधीर शहा आणि एस.पी. जैन यांनी युक्तिवाद केला होता. ६ जुलैला सुजित वाणी, संजय तोतला आणि अंबादास बाबाजी मानकापे या तिघांच्या वकिलांनी आज जामीन अर्जावर आपली बाजू मांडली. दरम्यान, आज (गुरुवार) पासून सरकार पक्षाने युक्तिवाद सादर करायला सुरुवात केली आहे. आज अपूर्ण राहिलेला युक्तिवाद सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण उद्या (शुक्रवार) रोजी पूर्ण करण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती एस एस गोसावी यांच्या न्यायालयात या सर्व जामीन अर्जावर कामकाज सुरु आहे.