मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवून सर्व हिंदुत्ववादी मतं एका पेटीत आणण्याचा भाजपाचा डाव असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते सातारा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, सध्या निवडणूक आयोगासमोर खरी शिवसेना कोणती? हा वाद सुरू झाला आहे. विधानसभा आणि लोकसभेचं चित्र स्पष्ट आहे. पण संघटनेच्या पातळीवर जे शाखाप्रमुख आहेत, जिल्हाप्रमुख आहेत, बाकी पदाधिकारी आहेत, त्यांची काय परिस्थिती आहे, यावर निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावा लागेल. पण यामध्ये भाजपाचा एकमेव उद्देश असा आहे की, शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवायचं आणि याचा फायदा घ्यायचा. शिवसेना आणि भाजपात विभागलेली हिंदुत्ववादी मतं एका पेटीत आणायची, हा त्यांचा डाव आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेचं चिन्ह गोठवलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. पण जो निर्णय घ्यायचा आहे, तो निवडणूक आयोग घेईल, असं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
चव्हाण पुढे म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राहिलेली शिवसेना यांच्यातील आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी साम-दाम-दंड-भेदचा वापर केला जात आहे. त्यामुळे सावध राहिलं पाहिजे असं मी माझ्या पक्षश्रेष्ठींना सांगितलं आहे. महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता नाकारता येणार नाही. कारण सरकार स्थापन करण्यामध्ये प्रचंड वाद निर्माण होईल किंवा वाद उद्भवेल, अशी भीती मला वाटते. त्यामुळे नाइलाजानं त्यांना मुदतपूर्व निवडणुकीचं पाऊल उचलावं लागेल,असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.