मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राला अडचणीत आणण्यासाठी भाजपच्या काही लोकांनी न्यायालयात जाऊन खेळ केला आणि तो संपूर्ण देशाला महागात पडला, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाजपला लगावला आहे.
न्यायालयाच्या आजच्या निकालावर बोलताना भुजबळ म्हणाले, देशात कोणत्याही राज्याने ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नाही. त्यात भाजपची सत्ता असलेली राज्यही आहेत. फक्त महाराष्ट्राला अडचणीत आणण्यासाठी भाजपच्याच काही लोकांनी न्यायालयात जाऊन हा खेळ केला. पण हा देशाला महागात पडला आहे. आमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात सगळ्या देशातील ओबीसी गेले आहेत.
ओबीसी आरक्षण मिळत नाही, हे केंद्र सरकारचे पाप आहे. आता यावर एकच पर्यात आहे. केंद्र सरकारने अध्यादेश काढून देशातील ओबीसी आरक्षण वाचवावे. त्यासाठी भाजने पुढाकार घ्यावा. त्याचे श्रेय घ्यावे पण मार्ग काढावा, असं आवाहन भुजबळ यांनी केलं. आम्ही डेटा मागत होतो. तो दिला असता तर आज देशातील ओबीसी आरक्षण धोक्यात आले नसते. त्यांनी डबल गेम खेळायचा प्रयत्न केला. महाराष्ट्राला अडचणीत आणायचे आणि मध्य प्रदेश सांभाळायचे, असं सुरू होतं, अशी टीकाही त्यांनी केली.
भाजपच्या खेळामुळे ओबीसी आरक्षण अडचणीत आले आहे. आम्हाला विचारतात तुम्ही काय केलं? मग आता मध्य प्रदेशने काय केलं, असा प्रश्न आहे. संपूर्ण देश अडचणीत आला आहे. ह्यांची मातृसंस्था आहे. ते सांगतात आरक्षण संपवलं पाहिजे, हा मार्ग आहे का, असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला.