परभणी (वृत्तसंस्था) वारंवार सांगूनही सोबत राहायला तयार नसल्याने रागाच्या भरात पतीने शाळेत शिक्षणासाठी जात असलेल्या पत्नीवर रस्त्यातच गळ्यावर चेहऱ्यावर कोयत्याने सपासप वार करुन तिचा निर्घृण खून केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील बोरी गावात गुरुवारी (दि.१८) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात दाखल झाला.
नेमकं काय घडलं !
बोरी येथील कौसडी रोडवरील संभाजीनगरमध्ये राहणारी जयश्री वाव्हळ या मुलीचा विवाह काही वर्षांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील रोहित गायकवाड याच्यासोबत झाला होता. त्या दोघांची आधीपासूनच ओळख होती. रोहित गायकवाड हा छत्रपती संभाजीनगर येथे एका खासगी कंपनीत कामाला होता. तेथेच हे दोघे पती-पत्नी राहत होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये वादविवाद वाढले. लॉकडाऊनच्या काळात जयश्रीचे शिक्षण अर्धवट राहिले होते व ते तिला पूर्ण करावयाचे होते. त्यामुळे जयश्री वाव्हळ शालेय शिक्षणासाठी तिच्या आई-वडिलांकडे बोरी (ता. जिंतूर) येथे राहायला आली होती. तेथे ती नववीचे शिक्षण घेत होती. गुरुवारी सकाळी जयश्री नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना पती रोहितने तिला बोरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे शिवशंकर कॉलनीच्या रस्त्यावर अडवले.
‘आता बास झाले शिक्षण, आता शाळेत जाऊ नकोस !
‘आता बास झाले शिक्षण, आता शाळेत जाऊ नकोस, माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगरला राहायला चल, असा आग्रह त्याने धरला. त्यावरून जयश्री व रोहित यांच्यात वाद झाला. वाद वाढत गेला व जयश्रीने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्यामुळे रागात रोहितने सोबत आणलेला कोयता बाहेर काढला व जयश्रीच्या गळ्यावर व चेहऱ्यावर सपासप वार केले. यात जयश्री गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली. तेथे राहणाऱ्या रहिवासी नागरिकांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु परभणी येथे उपचारासाठी रुग्णालयात जात असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.
आई-वडील व भावंडांना बसला जबर मानसिक धक्का !
मृत जयश्री बोरी येथील शाळेत वर्ग नववीमध्ये शिक्षण घेत होती. तिचे आई- वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते त्यांना जयश्रीसह तीन मुली व एक मुलगा आहे. ज्याच्यावर जयश्री जीवापाड प्रेम करत होती, त्यानेच तिची निर्घृण हत्या केल्याचे समजल्यानंतर तिचे आई-वडील व भावंडांना जबर मानसिक धक्का बसला आहे. जयश्रीवर गुरुवारी सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्वतः होऊन ठाण्यात हजर झाला !
जयश्रीची भर रस्त्यावर कोयत्याने हल्ला करून हत्या करण्यात आल्यानंतर आरोपी रोहित गायकवाड स्वतः होऊन ठाण्यात हजर झाला. जयश्रीची हत्या झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे गावात पसरले. त्यामुळे शालेय विद्यार्थी व त्यांचे पालकांमध्ये भीती पसरली आहे. जयश्री वाव्हळ हिचा खून आरोपीने कशासाठी केला त्यामागे इतरही काही कारणे आहेत काय? याचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.