जळगाव प्रतिनिधी : राज्यात सध्या उन्हाची भीषण लाट पसरली असून वाढत्या तापमानामुळे उष्माघाताने नागरिक दगावण्याचे प्रमाण अत्यंत चिंताजनक झाले आहे. या पार्श्वभूमीवर, विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांना पत्र लिहून उष्माघाताला तात्काळ ‘नैसर्गिक आपत्ती’ घोषित करण्याची मागणी केली आहे. राज्यात आणि विशेषतः जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, वाढत्या उष्णतेमुळे अनेक ठिकाणी नागरिकांचे उष्माघाताने मृत्यू होत आहेत.
या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधताना एकनाथराव खडसे यांनी पत्रात नमूद केले आहे की, त्यांनी यापूर्वीही विधिमंडळात तारांकित प्रश्न आणि औचित्याच्या मुद्द्याद्वारे या विषयावर सरकारचे वारंवार लक्ष वेधले होते. सध्या राज्याची परिस्थिती इतकी कठीण झाली आहे की, खुद्द सरकारनेच खबरदारीचा उपाय म्हणून दुपारी १२ ते ४ या वेळेत नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशी नियमावली (SOP) प्रसिद्ध केली आहे. शासन स्तरावर या संकटाचे गांभीर्य मान्य केले जात असताना, केवळ तांत्रिक कारणास्तव उष्माघाताचा समावेश नैसर्गिक आपत्तीत नसल्यामुळे मृतांच्या वारसांना व परिवाराला मदतीपासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे, असे खडसे यांनी पत्रात म्हटले आहे.
तरी राज्य शासनाने या विषयावर तात्काळ कार्यवाही करून उष्माघाताला ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून समाविष्ट करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. केंद्र सरकारकडून अंतिम निर्णय होईपर्यंत राज्य सरकारने आपल्या विशेष निधीतून किंवा आपत्ती व्यवस्थापन निधीतून, उष्माघाताने मृत झालेल्या व्यक्तींच्या परिवाराला किमान १० लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही विनंतीही एकनाथराव खडसे यांनी या पत्राद्वारे केली आहे.
















