जळगाव (प्रतिनिधी) खेडी शिवरातील कावेरी हॉटेल परिसरात विद्या नगर येथे कुत्रा भुंकत असल्याने त्याला आवरण्यास सांगितल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून शुक्रवारी, १७ जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास परिसरातील नागरिकांवर दगड, लाकडी काठी आणि फरशीच्या तुकड्यांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीन नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येत असून, पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहराजवळील खेडी शिवारातील कावेरी हॉटेल परिसरात असलेल्या विद्यानगर येथे कुत्र्याच्या वादातून हाणामारीची घटना घडली. सोनी वाणी नामक महिलेकडे असलेला कुत्रा नेहमीच परिसरातील नागरिकांना त्रास देत असे. तो लहान मुलांवर धावून जात चावा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याने तीन दिवसांपूर्वी नागरिकांनी त्या महिलेला समज दिली होती.
शुक्रवारी, १७ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता, कुत्रा पुन्हा एका लहान मुलावर धावून गेला. यावर नागरिकांनी त्या महिलेला कुत्रा आवरण्यास सांगितले. याचा राग आल्याने महिलेने ओळखीतील ५-६ जणांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी गल्लीत उभ्या चंद्रकांत जीवराम चौधरी (४०), किशोर अर्जुन पाटील (४२), आणि चेतन लक्ष्मण खडसे (३५) यांना दगड, लाकडी दांडके आणि फरशीने मारहाण केली. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
यावेळी गोंधळात महिलांसह इतर नागरिकांवरही हल्ला आणि दगडफेक करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच शनीपेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तीन संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.