नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या २४ तासांत ७४८६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर १३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे दिल्लीत एका दिवसात करोनामुळे होणाऱ्या मृत्युंच्या संख्यने विक्रम केला आहे. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे.
या महत्त्वाच्या बैठकीत भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षाचे नेतेमंडळी देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे मात्र दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या हात बाहेर जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. दिल्लीत करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केजरीवाल सरकारने केंद्राला गर्दी होत असलेले बाजार बंद करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. तसंच लग्न समारंभात २०० च्या ऐवजी फक्त ५० पाहुणांना येण्याची परवानगी दिली आहे. कोरोना व्हायरस या विषाणूमुळे राजधानी दिल्लीला मोठा फटका बसत आहे. त्यासाठी सर्व पक्षांची बैठक आज सकाळी ११ वाजता दिल्ली सचिवालयात होणार आहे. कोरोनाच्या विळख्यातून राजधानीला कसं बाहेर काढता येईल याविषयावर बैठकीत चर्चा होणार असून १०० खासगी रुग्णालयांवर रिपोर्ट तयार करण्यासाठी केंद्राने १० टीम तयार केल्या आहेत.
दिल्लीत २६ हजार करोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. दिल्लीत करोनाचे १६ हजार बेड आहेत. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची माहिती सकाळ आणि संध्याकाळ डॉक्टर फोन किंवा व्हिडीओ कॉलवर घेत आहेत. संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांवर बारकाईने लक्ष ठेवलं जाईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं.