मुंबई (वृत्तसंस्था) केवळ डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि प्रोग्रॅमर पदाचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला थेट मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पुढे हाच व्यक्ती जळगाव विद्यापीठात कुलसचिव पदापर्यंत जाऊन पोहोचला. यानिमित्ताने मुंबई विद्यापीठात उप-कुलसचिव पदाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनागोंदी झाल्याचे समोर आले आहे. याबाबतचे वृत्त ‘दैनिक सकाळ’ने दिले आहे.
‘दैनिक सकाळ’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मुंबई विद्यापीठात २०११-१२ दरम्यान विनोद पाटील यांची विद्यापीठात परीक्षा नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती; त्यावेळी पाटील यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून ४ वर्षे ७ महिने आणि प्रोग्रॅमर म्हणून ११ वर्षे ६ महिने अनुभव होता. हा अनुभव उप-कुलसचिव पदासाठी अनुभव प्रमाणसंहिता १९८४ च्या तरतुदीनुसार समकक्ष नाही, असा स्पष्ट शेरा विद्यापीठात झालेल्या विविध पदांच्या नियुक्ती अहवालात दिला आहे. हा अहवाल हाती लागल्याचा दावा वृत्तामध्ये ‘सकाळ’ने केला आहे. तसेच या अहवालात अनेक आक्षेप नोंदविण्यात आल्याचेही म्हटले आहे. मुंबई विद्यापीठाने पाटील यांच्याप्रमाणे टंकलेखक, डेटा एन्ट्री ऑपरेटर आदी पदांवरील व्यक्तींचीही उप-कुलसचिव पदावर नियुक्ती केली आहे. याची चौकशी करण्याची मागणी माजी सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी केली.
मुंबई विद्यापीठाने उप-कुलसचिव पदासाठी आवश्यक असलेला अनुभव आणि नियमावली धाब्यावर बसविली आहे. विद्यापीठाने अनेक टंकलेखक, लघुलेखक, खासगी कंपनीतील लिपिक- संगणक अधिव्याख्याता, मुख्याध्यापक, मानधन तत्त्वावरील जिल्हा प्रकल्प अधिकारी, समन्वयक, लेखा सहायक, असा अनुभव असलेल्या तब्बल १८ जणांना उप-कुलसचिवपदी नियुक्ती केली आहे. तर २०११-१२ मध्ये मी मुंबई विद्यापीठात परीक्षा नियंत्रक म्हणून रुजू होताना माझ्याकडे प्रोग्रॅमर पदाचा अनुभव होता, शिवाय हे पद वर्ग-एकमध्ये होते. मी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र त्यानंतर सादर केले असल्याची प्रतिक्रिया जळगाव विद्यापीठाचे कुलसचिव विनोद पाटील यांनी दिली आहे.
दुसरीकडे कुलसचिवपदी विनोद पाटील यांची झालेली नियुक्ती रद्द करण्याची मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता आणि अॅड. कुणाल पवार यांनी केली होती. यासंदर्भात श्री. गुप्ता यांनी कुलगुरु वी.एल. माहेश्वरी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. जळगाव सत्र न्यायालयातील चौथे सहाय्यक दिवाणी न्यायालयात आरसीसी क्रं. 610 / 2006 नुसार विनोद पाटील यांच्याविरुद्ध दावा दाखल करण्यात आला आहे. विनोद पाटील यांच्याविरुद्ध समन्स काढण्यात आले त्यांनी परीक्षा विभागात अफरातफरी करुन संगणकाचा पासवर्ड बदलून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे समजल्याचे दीपककुमार गुप्ता यांनी दिलेल्या पत्रात म्हटले होते. या भ्रष्टाचाराची चौकशी न करता त्यांना कुलसचिवपदी नियुक्ती देण्यात आली असल्याचे गुप्ता यांनी कुलगुरु आणि राज्यपालांना दिलेल्या पत्रात म्हटले होते. विनोद पाटील यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये इंजीनियरिंग विभागातील मेकॅनिकल ब्रँचच्या सुमारे 200 ते 250 विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना उत्तीर्ण केल्याचा आरोप आहे.