धरणगाव (प्रतिनिधी) ब्रिटीश काळापासून अस्तिवात असलेला टिळक तलावाचे सुशोभीकरण करण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे. सध्याच्या परिस्थितीत हा तलाव अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. तलावात पूर्णपणे झाडेझुडपे, वेली साचलेली आहेत. त्यामुळे तलावासह संपूर्ण परिसराची स्वच्छता करत सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
टिळक तलावाचे सुशोभीकरण व स्वच्छता झाल्यास परिसरातील पाणी टंचाई दूर होऊ शकते. तलावाला पाण्याचे स्त्रोत चांगल्या प्रमाणात आहे. त्यामुळे आजूबाजूला असलेल्या बोरवेल, विहीरी यांनादेखील त्याचा उपयोग होईल. स्वर्गीय लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीमभाई पटेल यांनी तलाव स्वच्छ करण्यासाठी सुरुवात केली होती. अगदी स्वतः तलावात उतरून मेहनत घेतली होती. परंतु त्यांच्या निधनानंतर तलावाचे सुभोभीकरणाची योजना मागे पडली. धरणगाव नगरपालिकेला पर्यावरण विभागामार्फत टिळक तलाव संवर्धनासाठी दोन कोटी निधी मंजूर झालेला असून कामासाठी २५ लाख रुपये नगरपालिकेत प्राप्त झाले असल्याचे कळते. परंतू त्याबाबत प्रत्यक्षात कार्यवाही करण्यात आल्याचे दिसून येत नाही. प्रशासनाने लवकरात लवकर पावसाळा सुरु होण्याआधी तलाव स्वच्छ करावा, अशी मागणी होत आहे.