धरणगाव (प्रतिनिधी) संपूर्ण देश युद्धजन्य स्थितीकडे लक्ष ठेवून आहे, अशा पार्श्वभूमीवर आज धरणगाव शहरात एक आगळीवेगळी, देशप्रेमाने ओतप्रोत भरलेली “तिरंगा रॅली” विविध राजकीय, सामाजिक संघटना आणि देशप्रेमी नागरिकांच्या वतीने भव्य उत्साहात पार पडली.
श्री बालाजी मंदिरापासून सुरू झालेल्या या रॅलीची सुरुवात पोलीस निरीक्षक पवन देसले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विविध मान्यवरांच्या हस्ते भारत माता प्रतिमेच्या पूजनाने झाली.
या रॅलीची खासीयत म्हणजे पाचशे मीटर लांबीचा भव्य तिरंगा, जो देशभक्त नागरिकांनी खांद्यावर उचलून शहरभर मिरविला. “हिंदुस्थान जिंदाबाद”, “पाकिस्तान मुर्दाबाद” अशा घोषणा देत संपूर्ण शहरात देशप्रेमाचा जल्लोष झाला.
रॅली श्री बालाजी मंदिर, धरणी चौक, कोटबाजार, परिहार चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. तेथे पुष्पहार अर्पण करून राष्ट्रभक्तीच्या आणि एकतेच्या संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या प्रसंग युवकांचा उत्साह गगनाला भिडलेला दिसून आला, आणि तिरंग्याखाली उभ्या प्रत्येकाने “देशासाठी काहीतरी करायचे” या भावना जागृत केल्या.
या ऐतिहासिक रॅलीत भाजप, शिवसेना व महायुतीचे दिग्गज नेते आणि पदाधिकारी – प्रतापराव पाटील, सुभाष पाटील, प्रा. संजय पाटील, पी.एम. पाटील, संजय महाजन, कमलेश तिवारी, भानुदास विसावे, शिरीष बयस, डि.ओ. पाटील, इत्यादींसह असंख्य नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे, हिंदू-मुस्लिम देशप्रेमी संघटनांनी खांद्याला खांदा लावून सहभाग नोंदवला, हे धरणगावच्या सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरले.
ही रॅली म्हणजे केवळ शोभायात्रा नव्हती, ती होती राष्ट्रभक्तीचा जिवंत अनुभव – एक जीवंत साक्षीदार शहराच्या इतिहासात.