जळगाव (सुरेश उज्जैनवाल) शेतकरी समाजासाठी हक्काचं आर्थिक आधारवड असलेल्या जेडीसीसी बँकेस आपल्या राजकीय स्वार्थाचा आखाडा बनवू नका, अशी अपेक्षा जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांनी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने व्यक्त केली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतांना संस्थेची बदनामी होणार नाही, याची जाणीव ठेवण्याचे आवाहन सभासद शेतकऱ्यांनी केले आहे.
पाच वर्षे सोबत असतांना गैरवापर दिसला नाही आणि पक्षीय भूमिका कवटाळत आरोप करणे स्वतः ला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणाऱ्यांना शोभणारे नाही. मुळात महत प्रयत्नानंतर बँकेला चांगले दिवस आलेले आहेत. आपल्या वाटचाली ची 105वर्षे पूर्ण करून 106 व्या वर्षात पदार्पण करणारी बँक आपल्या सभासद शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य करण्यात आत्म निर्भर झाली आहे. आपल्या माननीय पंतप्रधानांनी सुद्धा अलीकडेच आत्म निर्भर भारताची संकल्पना मांडली आहे. बँकेने चालू आर्थिक वर्षात स्व भांडवलातून 600 कोटी रुपया पेक्षा जास्त पीक कर्ज वाटप केले आहे. परवा पर्यंत ही संस्था राज्य शिखर बँकेवर विसंबून होती. अपुऱ्या सेवक वर्गाच्या माध्यमातून प्रशासकीयदृष्ट्या ही बँकआपली सेवा शेतकऱ्यांना चोखपणे बजावत आहे. बँकेवरचा ठेवीदारांचा विश्वास कायम आहे.सुमारे साडे तीन हजार कोटीच्या ठेवी या संस्थेत आहेत, ही विश्वासाच्या दृष्टीने फार मोठी जमेची बाजू म्हणता येईल. प्रशासकीय खर्च ही तुलनेने खूपच कमी आहे.
…..व्याज परताव्याच्या रकमेचे आव्हान
बँकेने शेतकऱ्यांना दिलेल्या पिक कर्जावरील सरकार कडून मिळणारी व्याज परताव्याची रकम थकली आहे. सुमारे 50 कोटी रुपये व्याज परताव्या पोटी सरकार कडून येणे आहे. नुकत्याच सम्पलेल्या संचालक मंडळात चार आमदार एक खासदार संचालक होते, त्यांनी ही थकीत रकम मिळविण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते. मुळात बँक आपल्या स्व भांडवलातून पीक कर्ज पुरवठा करते, अशा वेळी व्याज परताव्याची रकम शासन कडून वेळीस मिळाली तर बँकेचा भार कमी होईल. ही जबाबदारी संचालकांची नव्हे का? बँकेचे काही प्रश्न केंद्र अथवा राज्य स्तरावर असतात त्याचा काही उपयोग या खासदार, आमदार असलेल्या संचालकांचा होतो का? हा देखील एक प्रश्न आहे.
….कृषी अर्थ करणात बँकेची महत्वाची भूमिका…
जिल्ह्याच्या कृषी अर्थ करणात या संस्थेचं मोठं योगदान आहे. केवळ कृषिच नव्हें तर या संस्थेच्या अर्थ सहाय्यातुन सहकारी कारखानदारी, शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. सहकाराच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती झाली. संचालक पद भूषविलेल्या अलीकडच्या आमदारांनी कोणत्या नाविन्यपूर्ण संस्था स्व प्रयत्नाने उभ्या केल्या? पक्षीय राजकारण करण्यासाठी अनेक विषय आहेत किमान जेथे शेतकऱ्यांच्या घामाची परिणामकारक गुंतवणूक आहे, तेथे राजकीय स्वार्थ बाजूला ठेवला तरी फार मोला ची मदत या संस्थेला केल्याचे म्हणता येईल…
कोणत्याही व्यक्ती पक्ष अथवा नेत्याला उद्देशून हा लेख लिहिलेला नाही…कृपया याची नोंद घ्यावी..
सुरेश उज्जैनवाल
पत्रकार, जळगाव
८८८८८८९०१४