जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे जाहीर करत आमचे सर्व उमेदवार हे अर्ज माघारी घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे वर्चस्व या बॅंकेवर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकनाथराव खडसे हे भाजपमध्ये असताना पक्षाचे या बॅंकेवर वर्चस्व होते. मात्र खडसे हे राष्ट्रवादीत गेल्याने भाजपची ताकद क्षीण झाली. तरीही भाजपला सामावून घेत सर्वपक्षीय पॅनेल करण्याचा प्रयत्न होता. मात्र केंद्रीय तपास संस्थांकडून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याने जळगाव जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भाजपशी युती न करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काॅंग्रेसने घेतला. त्यामुळे भाजप येथे एकाकी पडली. दुसरीकडे राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस आणि शिवसेना या पुढाकार घेत एकत्रित पॅनेल तयार केले. एखाद्या जागेसाठीचे मतभेद वगळता तीनही पक्षांनी आपापले उमेदवार निश्चित केले. बंडखोरी होण्याची शक्यताही मावळली. त्यामुळे भाजपला येथे चांगले उमेदवार मिळू शकले नाहीत. जे ताकदवान होते अशा खासदार रक्षा खडसेंसारख्या नेत्यांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे भाजपचे या निवडणुकीत पानिपत होणार असल्याची शक्यता निर्माण झाली. ही सारी परिस्थिती पाहून भाजपने या निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा आहे.
बहिष्कारामुळे ‘मविआ’चा विजयाचा मार्ग सोपा
दरम्यान, गिरीश महाजन यांनी या बॅंकेत केवळ राजकारण सुरू असून शेतकऱ्यांच्या हिताला काळे फासले जात असल्याचा आरोप करत निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला. भाजपच्या या बहिष्कारामुळे महाविकास आघाडीचा विजयाचा मार्ग सोपा झाला आहे.