मुंबई (वृत्तसंस्था) स्मार्ट प्रीपेड मीटरला सर्व स्तरातून होणारा विरोध, ३०० युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांवर स्मार्ट मीटरचा पडणारा आर्थिक भार यामुळे महावितरणने घरगुती वीजग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या महावितरणतर्फे स्मार्ट मीटर बसवण्याच्या योजनेत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण ट्रान्सफॉर्मर आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येत असल्याचे सांगितले आहे.
नियामक आयोगाच्या मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालयाच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये आरडीएसएस वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा होईल, असे सांगण्यात आले होते. स्मार्ट मीटर बसवण्यासाठी २ कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या तसेच स्मार्ट मीटर बसवण्याचे कंत्राटही विविध कंपन्यांना देण्यात आले आहे. दरम्यान, सध्या विविध कार्यालयांमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. मात्र, जर घरगुती ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नसतील, तर कोट्यवधी रुपयांच्या निविदा कुणासाठी काढल्या ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.