जळगाव (प्रतिनिधी) लग्नाहून परत येत असताना दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात दुभाजकाजवळ असलेल्या पत्र्याने मानेची नस कापली जाऊन १६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. चेतन दीपक वराडे (रा. विटनेर, ता. जळगाव), असे मयत तरुणाचे नाव आहे. हा अपघात बुधवार, ३ जानेवारी रोजी दुपारी जळके गावाजवळ झाला.
विटनेरचा रहिवासी असलेला चेतन वराडे व पुष्पल राजाराम गायकवाड (२०, रा. विटनेर, ता. जळगाव) हे दोघं जण बुधवारी दुचाकीने लग्नाला गेले होते. लग्नाहून परतत असताना वावडदे ते विटनेरदरम्यान जळके गावाजवळ दुचाकी घसरली. या अपघातात चेतनचा मृत्यू झाला तर पुष्पल जखमी झाला. अपघातानंतर मयत व जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले.