औरंगाबाद (वृत्तसंस्था) वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरण कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव पुण्यात अटकेत आहे. मात्र, त्याच्या अनुपस्थितीत कन्नडच्या राजकाराणात नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विशेष म्हणजे अकरावीत शिकत असलेला त्यांचा सुपुत्र आदित्य जाधव यांनं थेट पत्रकार परिषद घेऊन वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली.
धक्कादायक म्हणजे हर्षवर्धन यांचे पॅनल हे त्यांची पत्नी व भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या विरोधात उभे करण्यात आले आहे. आदित्य यांनी वडिलांच्या अनुपस्थितीत मंगळवारी कन्नडमध्ये पत्रकार परिषद आयोजित करून पॅनलची अधिकृत घोषणा केली. तालुक्यातील त्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हर्षवर्धन राजकारणात सक्रिय होत असल्याचे यावेळी त्यांनी सर्व पत्रकारांना सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत रायभान जाधव यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. नवख्या आदित्य यांनी पत्रकारांच्या खोचक प्रश्नांनाही अतिशय समर्पक उत्तरे दिली. हर्षवर्धन अटकेत असताना आदित्य यांनी स्वतः सर्व सूत्रे हातात घेतली. यानिमित्ताने स्वतःचीही राजकीय वाटचाल सुरू केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तालुक्यातील सर्व कार्यकर्ते सोबत असल्याचे सांगत तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांच्या औंध मारहाण प्रकरणी रोज नवनवे खुलासे आणि आरोप होताना दिसत आहेत. हर्षवर्धन जाधव यांचे सासरे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीच हा हल्ला घडवून आणला आणि जाधव खोट्या गुन्ह्यात अडकवलं, असा सणसणाटी आरोप त्यांच्या वकीलांनी केला आहे. तसंच या प्रकरणातील सहआरोपी आणि हर्षवर्धन जाधव यांच्या मैत्रीण इशा झा देखील पहिल्यांदाच माध्यमांसमोर आल्या आहेत. हर्षवर्धन जाधव यांच्या वकिलांनी दानवेंवर आरोप केला असला तरी हल्ला करणारा नगरसेवक हा काँग्रेसचा आहे. या प्रकरणानंतर हर्षवर्धन जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही शाब्दिक हल्ले चढवले आहेत.