
भुसावळ, (प्रतिनिधी) शहाबाज देशपांडे – नागरिकांच्या दैनंदिन तक्रारी, प्रशासकीय प्रश्न आणि विविध अडीअडचणींचे स्थानिक स्तरावर जलद व कालबद्ध निवारण करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी जळगाव यांच्या संकल्पनेतून उपविभाग स्तरावर ‘जनसमाधान बैठक’ हा लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत गुरुवारी भुसावळ येथील उपविभागीय कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनसमाधान बैठक संपन्न झाली.
बैठकीदरम्यान नागरिकांनी विविध शासकीय विभागांशी संबंधित समस्या व मागण्या थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
उपक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये
स्थानिक स्तरावर तात्काळ निवारण :
नागरिकांना आपल्या समस्यांच्या निवारणासाठी जिल्हा मुख्यालयात वारंवार जावे लागू नये, यासाठी जिल्हाधिकारी दर गुरुवारी उपविभागीय कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरच तक्रारींचे प्रभावी व जलद निराकरण करण्यास मदत होत आहे.
डिजिटल पारदर्शकता व अर्जांचा मागोवा :
बैठकीत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक अर्जाचे तात्काळ स्कॅनिंग करून त्याची ‘जनसमाधान पोर्टल’ वर नोंद केली जात आहे. प्रत्येक अर्जाला स्वतंत्र क्यूआर (QR) कोड देण्यात येत असून, त्याद्वारे नागरिकांना आपल्या अर्जाची सद्यस्थिती ऑनलाइन पाहता येणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता वाढून अर्जांच्या कार्यवाहीवर प्रभावीपणे लक्ष ठेवणे शक्य होत आहे.
या उपक्रमामुळे नागरिकांना प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळत असून, शासनाच्या सेवा अधिक वेगाने, पारदर्शकपणे आणि लोकाभिमुख पद्धतीने उपलब्ध करून देण्यास मदत होत आहे.
















