जळगाव (प्रतिनिधी) – पुणे येथे मुलाकडे गेलेल्या राजू दौलत बारी (रा. शिरसोली प्र.बो., ता. जळगाव) या स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी रोकडसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण पाच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी ते घरी परतल्यानंतर शिरसोली प्र.बो. येथे उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे राजू बारी हे वास्तव्यास असून ते जळगाव तहसील कार्यालय परिसरात स्टॅम्प वेंडर आहे. शासकीय कार्यालयांना तीन दिवस सुटी असल्याने राजू बारी हे दि. १ मे रोजी पुणे येथे मुलाकडे गेले होते. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून कोठीत ठेवलेली दोन तोळ्याची सोन्याची पोत, दीड तोळ्याची चेन, पाच ग्रॅम वजनाचे कर्णफुले, देवी-देवतांचे चांदीचे दागिने व रोख १५ हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले.
पुण्याहून परतल्यानंतर घटना उघडकीस
तीन दिवसानंतर सोमवार दि. ५ मे रोजी राजू बारी हे पुण्याहून जळगावात परतले. घरी गेल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. यावेळी त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता, त्यांना चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त फेकल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याची खात्री झाली.
पोलिसांची घटनास्थळी पाहणी
राजू बारी यांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार उपनिरीक्षक राहुल तायडे, पोहेकॉ प्रदीप चौधरी, धनराज गुळवे, चेतन पाटील हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी घरातील साहीत्याची पाहणी केली. याप्रकरणी सायंकाळी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















