मुंबई (वृत्तसंस्था) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये भ्रष्टाचारासह अन्य आरोप झाल्यानंतर आता या योजनेला सरकारकडूनच क्लीन चिट मिळाली आहे. याबाबत जलसंधारण विभागाचा अहवाल समोर आला आहे.
महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील अनियमिततेची चौकशी करण्याची घोषणा केली होती. परंतु या चौकशीत जलयुक्त शिवार अभियानाला क्लिन चिट दिली जात आहे. या अभियानामुळे पिक पेरणी क्षेत्र आणि उत्पन्नात वाढ झाली. तसेच शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात सुधारणा झाली, असा निष्कर्ष राज्य सरकारच्या जल संधारण विभागाच्या अहवालात काढला आहे. योजनेत अनियमितता झाल्याचा आक्षेप कॅटच्या अहवालात घेतला गेला होता. आता या योजनेतील ५८ हजारापेक्षा जास्त झालेल्या कामांचा आढावा घेऊन कॅटचा अहवालात करण्यात आलेला हा आक्षेप फेटाळण्यात आला आहे.
या अभियानात तांत्रिक त्रुटी होत्या. तसेच कामात अनियमितता होती, अशी ताशेरे कॅटच्या अहवालात ओढण्यात आले होते. या योजनेचं जे उद्दिष्ट होतं ते पूर्ण झालं नाही, असंही अहवालात म्हटलं होतं. मात्र, आघाडी सरकारच्या जलसंधारण विभागाने हे कॅटचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत केलेल्या कामांमुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी सिंचनाची सुविधा निर्माण झाली. पाणी पातळी वाढली आणि कामाची पारदर्शक अंमलबजावणी झाली, असं जलसंधारण विभागाने दिलेल्या अहवालात म्हटलंय.
सत्याचाच विजय होतो – मुनगंटीवार
ठाकरे सरकारने जलयुक्त शिवारला क्लीन चिट देण्यात आल्यानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सत्याचाच विजय होतो अशी प्रतिक्रिया दिली आहे. हे सरकार बदनामीचं काम खूप चांगल्या रितीने करतं,”, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला आहे.