मुंबई (वृत्तसंस्था) धावपळीचे आयुष्य, बदलती जीवनशैली, अनुवांशिकता यामुळे मधुमेह होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेकजण पहिल्यांदा गोड खाणं म्हणजेच साखर सोडतात. पण हे सगळं करणं खरंच फायद्याचं ठरतं? साखर पूर्णपणे सोडल्यामुळे आपल्याला फायदा होतो की नुकसान?, तर मित्रहो, साखर पूर्णपणे बंद केल्याने शरीरावर काय परिणाम दिसून येतो हे तुम्हाला माहीत आहे का?, चला जाणून घेऊया.
एक व्यक्ती वर्षाला २८ किलो साखर फस्त करते
अमेरिकेमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असं समोर आलं होतं, की साधारणपणे एक व्यक्ती वर्षाला २८ किलो साखर फस्त करते. एवढ्या मोठ्या प्रमाणात साखर खाणं हे शरीरासाठी नक्कीच घातक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशांनुसार, एका व्यक्तीने दिवसाला जास्तीत जास्त पाच ते सहा चमचे, किंवा २५-३० ग्रॅम साखर खायला हवी. याहून अधिक साखर खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. तर दुसरीकडे अमेरिकन हार्ट असोसिएशनने म्हटलं आहे, की पुरुषांनी एका दिवसात साधारणपणे १५० कॅलरीज आणि महिलांनी १०० कॅलरीपर्यंत साखरेचं सेवन करावं. पुरुषांच्या तुलनेत महिलांनी कमी साखर खावी असं या संस्थेचं म्हणणं आहे. पण मग कमीत कमी ५-६ चमच्याऐवजी जर पूर्णपणेच साखर बंद केली तर?
साखरेचा वापर केलेले गोड पदार्थ सोडणं हे आरोग्यासाठी फायदेशीरच ठरू शकतं
साखरेचा वापर केलेले गोड पदार्थ पूर्णपणे सोडणं हे आरोग्यासाठी फायदेशीरच ठरू शकतं. केवळ महिनाभर साखर खाणं वा वापरणं सोडल्यामुळे, तुम्हाला पहिल्यापेक्षा जास्त एनर्जेटिक वाटू लागेल. यामुळे तुमची चिडचिडही नाहीशी होईल, तसंच वेळोवेळी जाणवणारा थकवाही कमी होऊ शकतो. एवढे सगळे फायदे पाहून तुम्ही विचार करत असाल, की आता साखर बंद करू तर थोडं थांबा. एकदमच साखर खाणं सोडणंही तुमच्या शरीराला घातक ठरू शकतं.
तुम्ही जर पहिल्यापासून नियमित साखर खात असाल, तर तुमच्या शरीराला त्याची सवय झालेली असते. एकदमच साखर खाणं सोडल्यामुळे तुम्हाला अचानक थकवा जाणवू शकतो. असं होऊ नये यासाठी तुम्हाला टप्प्याटप्प्याने साखर खाणं कमी करावं लागेल. म्हणजे, तुम्ही जर चहामध्ये दोन चमचे साखर घेता; तर ते कमी करून एक चमचा, अर्धा चमचा आणि मग शेवटी बंद अशा टप्प्यांमध्ये तुम्हाला साखर कमी करावी लागेल.
फळं, ड्रायफ्रूट्स असे गोड पदार्थ खाणं गरजेचं
आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही साखर पूर्णपणे बंद करणं तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचं असलं तरी फळं, ड्रायफ्रूट्स असे गोड पदार्थ खाणं गरजेचं आहे. पूर्णपणे गोड पदार्थ सोडणं तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. यामुळे तुमच्या बॉडी फॅटपासून ग्लुकोज बनवण्यासाठी आवश्यक घटक कमी पडतात. त्यामुळे शरीर कीटोन्सची निर्मिती सुरू करते. हे कीटोन्स तुमची चरबी जाळतात, मात्र अशा प्रकारे फॅट कमी केल्यास तुमच्या मसल्समध्ये दुखण्यास सुरूवात होते. एकंदरीत, साखर सोडल्यामुळे तुम्हाला फायदाच आहे. पण पूर्णपणे गोड पदार्थ सोडल्यामुळे तुमचं नुकसानच होऊ शकतं.