बीड (वृत्तसंस्था) मित्राच्या लग्नाला बीडला येत असताना कारला झालेल्या अपघातात तीन जिवलग मित्र जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला असून, त्याचीही प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात बीड तालुक्यातील पेंडगावजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडला. धीरज गुंदेचा (वय ३०), विवेक कांगुणे (वय ३३) आणि रोहन वाल्हेकर ( वय ३२, सर्व रा.नेवासा, जि. अहमदनगर) अशी मयतांची नावे आहेत तर आनंद वाघ (वय २८) हा गंभीर जखमी आहे.
बीड शहरातील एका मंगल कार्यालयात यांच्या मित्राचे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता लग्न होणार होते. त्यासाठीच दोन गाड्यांमधून १० मित्र बीडला येत होते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पेंडगावजवळ येताच चालकाचा कारवरील ताबा सुटला. यामुळे गाडी पलटी झाली. यात कारचा चक्काचूर झाला तर कारमध्ये अडकल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. आनंद वाघ हा मागे बसलेला असल्याने त्याला कमी मार लागला. अपघात ऐवढा भीषण होता की कारने रोडवर तीन चार पलट्या घेत रोडच्या बाजूला कार उलटली. यात कारचा अक्षरश: चुराडा झाला.
रात्री १२ वाजेच्या सुमारास दोन्ही गाड्यातील मित्रांनी एका हॉटेलवर जेवण केले. त्यानंतर विवेकने आपली गाडी दुसऱ्या मित्राकडे देत तो दुसऱ्या गाडीत बसला. बीड शहर काही अंतरावर असतानाच कारवरील ताबा सुटला आणि अपघात झाला. त्यात या तिघा मित्रांचा जीव गमवावा लागला. धीरज गुंदेचा आणि विवेक कांगुणे हे दोघं जण आई-वडिलांचे एकुलते एक मुलं होती. त्यामुळे मयत तिघां मित्रांच्या कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावणारा होता. धीरज गुंदेचा व विवेक कांगुणे हे विवाहित तर वाल्हेकर याचे अद्याप लग्न झालेले नव्हते.