अकोला (वृत्तसंस्था) शेतजमिनीच्या वाटपातून करण्यात आलेल्या चौघांच्या नृशंस हत्येप्रकरणी शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने एकाच कुटुंबातील तिघांना फाशीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील चौथा आरोपी घटनेच्या वेळी अल्पवयीन असल्याने त्याच्यावर बालगुन्हेगार न्यायालयात खटला सुरू आहे. अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण बाविस्कर यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील ग्राम मालपुरा गावात शेतीच्या जमिनीवरून हे हत्याकांड घडले होते.
अकोट न्यायालयाने फाशीची शिक्षा देण्याची ही पहिलीच घटना आहे. हरिभाऊ राजाराम तेलगोटे (५५), द्वारकाबाई हरिभाऊ तेलगोटे (५०) आणि श्याम ऊर्फ कुंदन हरिभाऊ तेलगोटे (२४) अशी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या दोषींची नावे असून, ते सर्व अकोटमधील राहुलनगरचे रहिवासी आहेत. शेतीच्या हिश्श्याच्या वाटणीतून झालेल्या वादातून या सर्वांनी मिळून धनराज सुखदेव च-हाटे, शुभम धनराज च-हाटे , गौरव धनराज च-हाटे आणि बाबुराव सुखदेव च-हाटे यांची गळा चिरून व पोटावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. धनराज च-हाटे हे पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. ही घटना २८ जून २०१५ रोजी घडली होती.
च-हाटे कुटुंबाची अकोटच्या मालपुरा गावी शेती होती. त्यात धनराज आणि बाबुराव यांची बहीण द्वारकाबाई हिस्सा मागत होती. त्यावरून तेल्हारा येथील दिवाणी न्यायालयात प्रकरण प्रलंबित होते. या घटनेच्या एक महिन्यापूर्वी द्वारकाबाईने भावांच्या शेताच्या मध्यभागी दोन एकर क्षेत्रफळावर कपाशीची लागवड केली होती. त्यानंतर तिच्या भावांनी तेथेच दुसऱ्या पिकाची लागवड केली. त्यावरून वाद चिघळला होता. २८ जून २०१५ रोजी द्वारकाबाई दुपारी तीनच्या सुमारास त्या शेतात सरकीची लागवड करीत होती. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर द्वारकाबाईने तिचा मुलगा श्याम याला फोन करून मालपुरा येथे बोलावले. श्याम, त्याचा अल्पवयीन भाऊ आणि वडील हरिभाऊ हे तेथे पोहोचले. त्यांनी च-हाटे कुटुंबाशी वाद घातला आणि द्वारकाबाईचे दोन भाऊ आणि भाचे यांच्यावर विळा, चाकू, कुऱ्हाडीने हल्ला चढवला. त्यात ते चौघे जागीच ठार झाले.
या प्रकरणातील आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना भारतीय दंडविधानाच्या कलम ३०२, ५०६ सहकलम ३४ नुसार शिक्षा ठोठावण्यात आली. द्वारकाबाई, तिचा पती आणि मोठा मुलगा यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सोबतच प्रत्येकी रुपये ५० हजार दंडही करण्यात आला आहे. दंड न भरल्यास आरोपींना ५ वर्षांच्या अधिकच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. चौथा आरोपी घटनेच्या वेळी अल्पवयीन असल्याने बालगुन्हेगार न्यायालयात खटला सुरू आहे.