जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्हा बँकेने आर्थिक वर्ष अखेर दि. 31 मार्च 2026 रोजी ठेवींमध्ये मोठी वाढ नोंदवत ₹4155 कोटींचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. बँकेच्या कामगिरीमुळे शेतकरी व सभासदांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसत आहे.
सन 2025-26 या आर्थिक वर्षात बँकेने एकूण ₹1072 कोटी कर्जवाटप केले असून, त्यापैकी ₹1017.76 कोटी कर्जाची वसुली करण्यात आली आहे. बँकेने थेट कर्जपुरवठा 39,455 शेतकरी सभासदांना केला असून, त्यातून ₹256.47 कोटींची वसुली झाली आहे.
बँकेच्या 0% व्याज योजनेला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला असून, अल्पमुदत शेती कर्जाची 95% वसुली करण्यात यश आले आहे. तसेच 155 प्राथमिक विविध कार्यकारी संस्थांनी 100% कर्जफेड करून विक्रमी कामगिरी केली आहे. या यशामध्ये संस्थांचे पदाधिकारी, सचिव व बँक कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे.
दरम्यान, 2026-27 खरीप हंगामासाठी पिककर्ज वाटप सुरू झाले असून, बँकेने कर्जदरात 10% वाढ केली आहे. शेतकऱ्यांनी 30 जून 2026 पर्यंत थकीत कर्ज फेडून वाढीव कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अनिष्ट तफावतीतील संस्थांसाठीही बँकेने कर्जवाटपाचा निर्णय घेतला असून, सुमारे ₹300 कोटींची माफी देऊन संस्थांना दिलासा दिला आहे. त्यामुळे अनेक संस्था अवसायनात जाण्यापासून वाचल्या आहेत.
बँकेचे चेअरमन भाऊसाहेब संजय पवार, व्हाइस चेअरमन आ. अमोल पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख व संचालक मंडळ यांनी शेतकरी सभासद व ठेवीदारांचे आभार मानले असून, पुढेही बँकेवर असेच प्रेम व विश्वास ठेवावा, असे आवाहन केले आहे.















