धरणगाव (प्रतिनिधी) : धरणगाव दिगंबर जैन समाजाचे आधारस्तंभ, ज्येष्ठ मार्गदर्शक आणि धर्मानुरागी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे मोहन काका गांधी (दादा) यांचे आज सायंकाळी सुमारे ५.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जैन समाजात हळहळ व्यक्त होत आहे.
ते श्रेयान्स जैन (बाबराजा) व विनोद जैन (छोटू) यांचे वडील होते, तसेच प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ. मयूर जैन यांचे मोठे काका होते. मोहन काका गांधी यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवा आणि मुनीसेवेसाठी अर्पण केले. त्यांनी अनेक दिगंबर जैन आचार्यांच्या सानिध्यात राहून जैन तत्वज्ञान, अनेकांतवाद यावर सखोल अभ्यास केला. आचार्य विद्यानंदजी, आचार्य विमलसागरजी, आचार्य आर्यनंदीजी, आचार्यश्री विद्यासागरजी, आचार्यश्री विरागसागरजी, पट्टाचार्य विशुद्धसागरजी, तसेच गणिनी प्रमुख ज्ञानमती माताजी यांच्या सहवासात त्यांनी अनेक ग्रंथांचे अनुवादही केले.
प्रख्यात प्रवचनकार मुनीश्री तरुण सागरजी महाराज यांच्याही त्यांच्यावर विशेष प्रेम होते. त्यांच्या विहारादरम्यान अनेक ठिकाणी मोहन काका गांधी यांना मंचाचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी देण्यात येत असे. त्यांच्या कार्यामुळे “धरणगावची ओळख मोहन काका गांधी” अशी ओळख राज्यभर आणि देशभर निर्माण झाली होती.
त्यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन अनेकांनी समाजसेवा आणि ट्रस्टची कामे पुढे नेली. धरणगाव समाजासाठी त्यांनी केलेले योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात येत असून, सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. स्व. मोहन काका गांधी यांची अंत्ययात्रा दि. ३० मार्च (सोमवार) रोजी सकाळी ८.३० वाजता त्यांच्या राहत्या घरातून “तापाधडली अमरधाम” येथे निघणार आहे.















