नाशिक (वृत्तसंस्था) अँटिलिया समोर आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राज्य सरकारवर चौफेर टीका होत आहे. यात आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणावर भाष्य केलं. गृहमंत्रिपदाच्या काळात घडलेल्या तेलगी मुद्रांक प्रकरणाचाही दाखला दिला. ‘तेलगी प्रकरणात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त आर. एस. शर्मा यांचंही नाव आलं होतं. त्यामुळं त्यांची मोठी बदनामी झाली. मात्र, ते निर्दोष होते हे कालांतरानं सिद्ध झालं,’ असं भुजबळ म्हणाले.
नाशिक येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ‘सचिन वाझे यांच्यावर कारवाई झालेली आहे. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) देखील अधिक तपास करत आहे. काही अधिकारी चुकीचे वागले तरी सगळे बदनाम होतात. त्यामुळं तपास पूर्ण होऊ द्या,’ असं ते म्हणाले. छगन भुजबळ यांनी यावेळी त्यांच्या गृहमंत्रिपदाच्या काळात घडलेल्या तेलगी मुद्रांक प्रकरणाचाही दाखला दिला. ‘तेलगी प्रकरणात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त आर. एस. शर्मा यांचंही नाव आलं होतं. त्यामुळं त्यांची मोठी बदनामी झाली. मात्र, ते निर्दोष होते हे कालांतरानं सिद्ध झालं,’ असं भुजबळ म्हणाले.
‘राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखी परिस्थिती आहे. विनाकारण रात्री बाहेर फिरणारे तसेच मास्कविना सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यांची वारी घडवून आणावी. चार ते पाच तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्याची ‘शिक्षा’ अशा बेजबाबदार वर्तन करणाऱ्या नागरिकांना ‘धडा’ शिकवून जाईल, असा आशावाद भुजबळ यांनी व्यक्त केला. मास्कचा वापर गर्दीमध्ये सहभागी होणे टाळणे, सामाजिक अंतर राखणे ही त्रिसुत्री नाशिकरांनी काटेकोरपणे पाळणे आवश्यक असल्याचे भुजबळ म्हणाले, तरच आपण लॉकडाऊनचे घोंगावणारे संकट दूर करु शकतो, असे त्यांनी नाशिककरांना उद्देशून सांगितले.
‘सरकारनं दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेतला जातोय. व्यापारी पेठा आणि भाजी मार्केटमध्ये मोठा गैरफायदा घेतला जातोय. कारवाई केली तर फार कठोर असेल. अनिश्चित काळासाठी दुकानं बंद करण्याची कारवाई होऊ शकते,’ असा इशाराही त्यांनी दिला. ‘आपण कोणती व्हॅक्सीन घेतली याची माहिती लस घेणाऱ्यानं ठेवायलाच हवी. २८ दिवसांनंतर, पुन्हा तोच डोस पुन्हा घेणं आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं.