औरंगाबाद (वृत्तसंस्था) आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे सोमवारी महाराष्ट्रात येणार आहे. मात्र, जे.पी. नड्डा यांच्या या कार्यक्रमपासून भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा वगळलं असून औरंगाबादमधील कार्यक्रमाचे निमंत्रणच नसल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपने मिशन 144ची सुरुवात केली आहे. आजपासून या मिशनला सुरुवात होणार आहे. त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा औरंगाबादमध्ये येत आहे. औरंगाबादमध्ये भव्य सभा घेऊन मराठवाड्यातून या मिशनला सुरुवात होत आहे. मात्र, मराठवाड्यातून होणाऱ्या या मिशनमधून मुंडे भगिनींना डावलण्यात आलं आहे.
जेपी नड्डा यांची आज औरंगाबादेत सभा होत असून या सभेच्या कार्यक्रमपत्रिकेत भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांचं नाव टाकण्यात आलेलं नाही. त्यामुळे भाजपने मुंडे भगिनींना आपल्या या मिशनमधून दूर ठेवलं असून आगामी विधानसभा निवडणुकीतही मुंडे भगिनींचा काहीच सहभाग नसणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. औरंगाबादमध्ये कार्यक्रम होत असल्याने या कार्यक्रमाला मराठवाड्यातील नेत्यांना पाचारण करण्यात आलं आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचं नाव या कार्यक्रम पत्रिकेत आहे. मात्र, मराठवाड्याच्या नेत्या असूनही पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
या पार्श्वभूमीवर माधव बन ओबीसी भटके विमुक्त संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ. खुशाल मुंडे यांनी भाजप नेत्यांवर टीकास्त्र डागले आहे. पंकजा मुंडे यांना महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपने ध्यानात ठेवायला पाहिजे की, या महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच देशात बहुजन जनतेची एकजूट भाजपच्या पाठीशी उभं करण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी दाखवून दिलेली आहे. मुंडे साहेबांप्रमाणे पंकजा मुंडे या ही भाजपात काम करत आहेत. परंतु भाजपचे काही नेते त्यांना बाजूला करत आहेत.२०२४ मध्ये भाजपला याची किंमत मोजावीच लागणार, हे लक्षात ठेवा, असे खुशाल मुंडे यांनी म्हटले आहे.