जळगाव (प्रतिनिधी) येथील कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील ऑनलाईन परीक्षेच्या घोटाळ्याची चौकशी करा व बेकायदेशीर नियुक्त केलेले प्र.कुलसचिव यांचा राजीनामा त्वरित घ्यावा, अशी मागणी कृती समितीने केली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील ऑनलाईन परीक्षेचे बील रुपये पाच कोटीपर्यंत आलेले असल्याने सदर बीलाबाबत प्रसार माध्यमात उलट सुटल बातम्या येवूनही याची अद्यापपावेतो कुठलीही चौकशी झालेली नाही. तसेच विद्यापीठाने देखील याची गांभिर्याने नोंद घेतलेली नाही. असे असतांना करोडो रुपयांची बेकायदेशीर बिले मंजुर करुन घेवून अदायगी करण्यात येत आहे. सदरची बाब अतिशय गंभीर असून, विद्यापीठाची आर्थिक स्थिती कमकुवत होत आहे. या बेकायदा बीलाची चौकशी न झाल्यास पर्यायाने विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे भविष्यात वेतनदेखील यापुढे वेळेवर होणार नाही. अशी भयावह परिस्थिती उदभवणार आहे. तरी अशा प्रकारचे गैर व्यवहार होत असलेल्या बीलांची शासनामार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी कृति समितीने केली आहे.
तसेच विद्यापीठातील एका वरिष्ठ प्राध्यापकाने नियमानुसार विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ.ई.वायुनंदन यांचेकडे रितसर अर्ज करुन प्र.कुलगुरु पदावर काम करण्याची संधी द्यावी अशी विनंती केली होती. कारण प्र.कुलगुरु पद जास्तीत जास्त सहा महिन्यांपर्यंत एका व्यक्तीकडे सोपवता येते. प्र.कुलगुरु पदावर सदरच्या व्यक्तीला सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला गेल्यामुळे त्यांनी तसा अर्ज दिलेला होता. सदरचा अर्ज प्रभारी कुलगुरु डॉ.ई.वायुनंदन यांनी तेव्हा विद्यापीठाचे कायदा अधिकारी भादलीकर यांच्याकडे कायदेशीर अभिप्रायासाठी पाठविला असता, कायदा अधिकारी यांनी सदर अर्जाच्या अनुषंगोने प्र.कुलगुरु डॉ.बी.व्ही.पवार यांच्याशी संगणमत करुन प्र.कुलसचिवपद नियम बाह्यरित्या पात्रता नसतांना भादलीकर यांच्याकडे सोपवून दोघांची वर्णी लावून घेतली आहे. अशी विद्यापीठ गोठात मोठया प्रमाणात कर्मचाऱ्यांमध्ये आणि समाज माध्यमांमध्ये चर्चा सुरु आहे. अशा प्रकारचे अनेक नियमबाहय कामे सध्या प्रभारी राजवटीत विद्यापीठात सुरु आहेत.
दरम्यान आज विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा लेखणी बंद आंदोलनाचा दुसरा दिवस असून, सदर दिवशी कर्मचाऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालेला आहे. वास्तविक प्रभारी कुलगुरु वायुनंदन हे विद्यापीठात नसतांना त्यांच्या ऐवजी प्र.कुलगुरु डॉ.बी.व्ही.पवार यांनी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन चर्चेव्दारे सोडवणे आवश्यक होते. त्यासाठी दि. ४ ऑक्टोंबर २०२१ रोजी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्यांनी मध्यस्थीकरुन प्र.कुलगुरुं डॉ.बी.व्ही.पवार यांच्या समवेत झालेल्या चर्चे अंती प्रभारी कुलगुरु डॉ.ई.वायुनंदन यांच्याशी चर्चाकरुन आपणास निर्णय देता, असे कृतिसमितीस आश्वासन दिले होते. तथापि, अद्यापपावेतो भादलीकर यांना प्र.कुलसचिव पदावरुन हटवलेले नाही.
विद्यापीठातील समस्त कर्मचारी विद्यापीठातील बेकायदेशीरपणे नियुक्त केलेले प्र.कुलसचिव डॉ.भादलीकर यांच्या राजीनाम्यावर ठाम असून, जो पर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे कृतिसमितीचे ठाम मत असून, विद्यापीठ प्रशासनाला याबाबतची जाणीव करुन दिलेली आहे. आज संध्याकाळपर्यंत भादलीकर यांना बेकायदा नियुक्त केलेल्या प्र.कुलसचिव पदावरुन न हटविल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असे विद्यापीठ कृतिसमितीने कळविले आहे.
यावेळी सचिव भैय्यासाहेब हिंमतराव पाटील, अध्यक्ष शरद पंडीतराव पाटील, उपाध्यक्ष सुरेश दंगलराव चव्हाण, कार्याध्यक्ष महेश लक्ष्मण पाटील, समन्वयक जगदीश नारायण सुरळकर, समन्वयक दुर्योधन बाबुराव साळुंखे आदी उपस्थित होते.
















