जत (वृत्तसंस्था) तालुक्यातील उमराणी येथील २७ वर्षीय संदीप गणपती बजंत्री या तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी मयताचे आजोबा सदाशिव बजंत्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमराणी येथीलच विशाल उर्फ विश्वनाथ सिद्राया कैकाडी (बजंत्री) ब रविंद्र उर्फ कुमार सिद्राय कैकाडी (बजंत्री) या दोघांविरुद्ध जत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी पसार आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास लोकांसमोरच घडली.
हा खून समाजातील लोकांचे समक्ष देवीचे मागील शिल्लक वर्गणीचे पैसे परत मागीतले या कारणावरून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असला तरी गावात अनैतिक संबंधाचा राग मनात धरून झाल्याची चर्चा आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, एका समाजाच्या देवीच्या यात्रेनंतरचा हिशोब करण्यासाठी समाजातील लोक एकत्रित आले होते. यावेळी सदाशिव मारुती बजंत्री यांनी शिल्लक राहिलेल्या वर्गणीचा जाब विचारला तसेच ती वर्गणी परत देण्याची मागणी केली. यावरून वाद सुरू झाला. यावेळी विश्वनाथ कैकाडी व कुमार सिद्राया कैकाडी हे सदाशिव यांना शिवीगाळ करू लागले.
यावेळी सदाशिव यांचा नातू संदीप याने शिवीगाळ करणाऱ्यांना जाब विचारला. यावरून वाद सुरू झाला व तिघात बाचाबाची सुरू झाली. यावेळी रवींद्र याने दगड घेऊन संदीपच्या डोक्यात दगडाने वर्मी घाव घातला. त्याला उपचाराला घेवून येत असताना अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा वाटेतच मृत्यू झाला. रात्री उशिरा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.